७ जून, २०१२

दीपोत्सव किल्ल्यांवरचा !

दीपोत्सव किल्ल्यांवरचा !

 राजगडावरील दीपोत्सव

दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप- आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ आणि या दिव्यांचा उत्सव म्हणजेच दीपोत्सव !!!

रायरेश्वरावरील दीपोत्सव

पूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा सह्यगिरीतील किल्ल्यांवर माणसांचा राबता होता त्यावेळी गडांवर नक्कीच दीपावली साजरी होत असणार यात शंका नाही. त्यावेळचे गडवैभव नक्कीच डोळ्यांचे पारणे फ़ेडणारे असेल. या गडकोटांनाही वाटत असेलच की पुन्हा पहावी तशीच दिवाळी !!
याचसाठी गडांच्या भूतकाळात दडलेल्या स्म्रृतींना उजाळा देण्यासाठी डोंगरयात्रा ट्रेकिंग क्लबची दिवाळी दरवर्षी सह्याद्रीतील एखाद्या किल्ल्यावर साजरी होते.

घरचं लक्षीपूजन उरकलं की पावलं आपसूक सह्याद्रीकडे वळतात ते याच दीपोत्सवासाठी. थोडा फराळ, एकवेळचा डबा, आकाशकंदील, तीन-चारशे पणत्या,२ लीटर गोडं तेलं, वातींचं बंडल, आणि प्रसादासाठी मोतीचूराचे लाडू इत्यादी सामानाची खरेदी उरकून सूर्यास्तापूर्वी गडावर पोहोचायची लगबग असते.
गडावर पोहोचल्यावर सगळी मंडळी आपापल्या कामाला लागतात. कोणी मंदिर झाडून घेतो, तर कोणी अंगणात सडे टाकतो, कोणी वाती वळायला लागतो तर कोणी पणत्यांची मांडणी करतो, कोणी तेल भरण्याची जबाबदारी घेतो. उत्साही महिला मंडळाची रांगोळ्यांची तयारी चालू असते. मुख्य गाभार्‍यासमोर घातलेल्या मोठ्या गालिच्यापासून ते अगदी प्रत्येक पणतीभोवती घातलेली सुरेख नक्षी वातावरण मंगलमय करून सोडते. कोणाच्या तरी मोबाईलवर मागे मंद आवाजात बिस्मिल्लाची सनई सुरू असते. गडदेवतेसमोर धूपदीप लावले जातात. वातावरण एकदम उत्साहपूर्ण आणि प्रसन्न असते. मंदिर आणि परीसरात सगळीकडे पणत्या लावल्या जातात. पारंपारीक पेहरावात मग गडदेवतेची आरती होते. सगळीकडे मंत्रमुग्ध करणारं आणि काहीसं भारावून टाकणारं असं वातावरण असतं.

 तिकोन्यावरील दीपोत्सव
या मंगलमयी सोहळ्यात कधी गडावरील किल्लेदार, गावकरी, पायथ्याच्या गावातली मंडळी कधी गडावरची ट्रेकर मंडळी आवर्जून सामील होतात. राजगडावरील किल्लेदार ढेबे, रायरेश्वरावरचा दगडू जंगम, तिकोन्याचं वसंता बोडकेचं  कुटुंब ही काही उल्लेखनीय नावं. त्यांना या सोहळ्याचं फार कौतुक !  दरवर्षीचा दीपोत्सव रायरेश्वरावरंच व्हावा हा दगडूचा निरागस हट्ट !


जेवणं झाल्यावर रंगतो गप्पांचा फड आणि मग मागील दिवाळीच्या आठवणीत मंडळी रमून जातात. शिवकल्याण राजातील गीतांची आवर्तनं होतात. किल्ल्याच्या इतिहासाची माहीती आणि महती जमलेल्या उपस्थितांना दिली जाते. पुढल्या वर्षीच्या दीपोत्सवासाठी एखाद्या नवीन किल्ल्याची निवडही तिथेच होते.


ह्या सगळ्यातून काय मिळतं ? तर उत्तर एकच, आत्यंतिक समाधान ! या गडकिल्ल्यांशी जोडली गेलेली नाळ अधिकाधिक दृढ होते, ते अशाच सगळ्या सोहळ्यांमुळे. या सगळ्यातून मिळाणार्‍या समाधानाची तुलना अन्य कश्या सोबत होणं निव्वळ अशक्य आहे !!

टीपः ई-शिवसह्याद्री मासिकात पूर्वप्रकाशित
अमोल नाईक
९८८१४९३३०३

7 comments:

♪♪♥ Prasik ♥♪♪.. ♪♪♥ प्रसिक ♪♪♥........ म्हणाले...

२०१२ चा दीपोत्सव कुठल्या किल्ल्यावर साजरा होणार आहे? त्यामध्ये सामील व्हायला मला नक्की आवडेल

अमोल नाईक म्हणाले...

लवकरच कळवतो. इथे पोस्ट टाकली जाईल त्या संदर्भात :)

Panchtarankit म्हणाले...

नुसत्या कल्पनेने अंगावर रोमांच उभे राहतात.

Panchtarankit म्हणाले...

नुसत्या कल्पनेने अंगावर रोमांच उभे राहतात.

Sameer Divekar म्हणाले...

अमोल, तू ग्रेट आहेस रे ! नक्की कळव कधी असतो दीपोत्सव.

Sanket Patekar म्हणाले...

masttt....man ekaa weglyaa vishwaat nhaawun nighaal...
kharach kiti shaant an manalaa aanand denaare te waatawarn asel...jenvhaa pratyek thikaani te dip aaplyaa prakshaamay jyotine saaraa parisar tejomay karat astil...!!

अमोल नाईक म्हणाले...

खरयं संकेत ... फार सुंदर अनुभूती असते या सगळ्याची ...

टिप्पणी पोस्ट करा