शिवतीर्थ रायगड

                                                              ॥ शिवतीर्थ रायगड ॥



भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दुर्ग अभ्यास वर्गाची सहल रायगडला जाण्याचं नक्की झालं आणि भूतकाळातल्या रायगडाच्या आठवणी मनात पिंगा घालु लागल्या. चित्तदरवाजा, वाघ दरवाजा, तोरणा-रायगड अशा अनेक वाटांनी रायगडाच्या वार्‍या करुन देखिल 'रायगड' म्हटलं की प्रत्येक वेळेस तीच उत्कंठा दाटून येते. येत्या रायगड भेटीची खासियत म्हणजे वास्तूतज्ञ श्री. गोपाळराव चांदोरकर गडावरील बांधकामाची माहीती देणार होते. यामुळे रायगडाविषयीच्या ज्ञानात आणखी भर पडणार होती.
रविवारी लवकर परत यायचे होते म्हणून मी एकटाच शनिवारी लवकर निघालो. बाकी मंडळी दुपारी १२ ला निघणार होती. जाताना ताम्हीणी घाट आणि येताना वरंधा घाट करायचा असे आधीच ठरविले होते. सकाळी १०.३० च्या सुमारास गाडीला किक मारली आणि पौड रस्त्याला लागलो. लवकर निघण्याचं आणखी एक कारण म्हणजे रायगडाच्या होळीच्या माळावर सूर्यास्त टिपायचा होता.
बावधन, भुगाव, पिरंगूट, पौड एका पाठोपाठ एक अशी सिमेंटची जंगलं मागे सोडत गाडी मुळशीकडे दामटली. मोबाईल वर मोगरा फुलला ची गाणी ऐकत, टाटा पॉवरच्या खाजगी रस्त्यावरून थोडं वर चढून येताच मुळशीचा निळाशार जलाशय डोळ्यात भरु लागला. तो पाहताच भर उन्हात होणारी डोळ्याची काहीली थोडीफार कमी झाली.


(क्विक बाईट  हॉटेलच्या मागच्या बाजूला दिसणारा मुळशी धरण परिसर)


जलाशय उजवीकडे ठेवत वळणावळणांच्या रस्त्याने मी क्वीक बाईट ला पोहोचलो. हे हॉटेल म्हणजे आम्हा पुणेकर खवय्यांचा मुळशीतला अड्डाच म्हणा ना !! तिथे मस्त थंडगार लिंबूसोडा आणि सोबत क्लब सॅन्डविचचा फडशा पाडून मी ताम्हीणी घाटाकडे निघालो. वाटेत ताम्हीणी गावातल्या विंझाई देवीच्या कळसाचे दुरूनच दर्शन घेतले. थोडे अंतर गेल्यावर काळदरीपाशी थांबलो. अमेरिकेतल्या ग्रॅंड कॅनियन सारखी दिसणारी ही दरी डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. ऐन उन्हाळ्यातही दरीमधे दाट झाडोरा आहे. दरीच्या पायथ्याला गार पाण्याचे डोह आहेत. पुण्याहून काळदरीचा एक दिवसाचा ट्रेक करता येतो. सुर्य डोक्यावर आला होता आणि बाटलीतलं पाणीसुध्दा गरम झालं होतं. पुणे रायगड जिल्ह्यांच्या हद्दीवर पवारांचे हॉटेल शिवराज आहे. हे देखिल आमच्या हादडीचे एक आवडीचे ठिकाण आहे. पण इथे मात्र मी काही न खाता फक्त जिरासोड्यावर तहान भागवली. थोड्यावेळ पवारांशी गप्पा मारल्या, त्यांच्या अंगणातलं घोरपडीचं पिल्लू पाहून रायगड जिल्ह्यात प्रवेश केला.
डोक्यावरचा रुमाल थोडा ओला करुन बांधला आणि घाट उतरू लागलो. घाटाच्या पायथ्याला एक फार्म हाऊसेस चा प्रकल्प सुरु आहे. वाढत्या कॉक्रीटीकरणामुळे ताम्हीणी घाटाचं पुढे कसं होणार असा पुसटसा विचार मनात डोकावून गेला. जुन्या विळे फाट्याच्या अलिकडेच म.औ.वि.म. चा सहा पदरी रस्ता झाला लागला, मग मात्र माझ्यातल्या रायडरला चेव आला आणि स्पीडोमीटरवर काटा शंभरला टेकला. पण माझा उत्साह फार काळ टिकला नाही. जेमतेम दिड-दोन किलोमीटरचा तो नवीन रस्ता संपून पुन्हा तोच जुना अनेक खाचखळग्यांनी भरलेला निजामपूर माणगाव कडे जाणारा रस्ता समोर आला. कसाबसा तो कंटाळवाणा प्रवास संपवून मुंबई-गोवा महामार्गावरच्या माणगावला पोहोचलो. उन्हं तापली होती. हाताला चटके बसत होते. कधी एकदा पाचाड गाठतो असे झाले होते. महामार्गावर डाव्या हाताला सोनगड, गांधारपाल्याची लेणी मागे सोडत रायगडकडे जाणार्‍या फाटयावर थांबलो. मँगो स्लाईसची अर्धा लिटरची बाटली पोटात रिकामी करून पाचाड कडे गाडी पिटाळली. इथून पुढचा प्रवास वाटेतल्या झाडांनी थोडा सुसह्य केला. बरोबर दुपारी २.३० ला हिरकणी वाडीतल्या जोगांच्या रोप-वे पाशी पोहोचलो. उदरभरणासाठी गरम गरम मिसळपाव आणि रस्सा वडा मागविला. बाकीची मंडळी यायला अजुन किमान दोन तास होते. तिथेच एका झाडाला सॅक टेकवून मस्तपैकी ताणून दिली. ५ ला जाग आली तेव्हा आजूबाजूला बरीच गर्दी झाली होती. तोंडावर पाणी मारुन थोडा फ्रेश झालो. चांगली तास-दिडतास झोप झाल्याने मस्त वाटत होते. सचिन जोशीला फोन लावला तर कळालं, अजुन मंडळाची बस माणगाव पर्यंतसुध्दा आली नव्हती. आपल्याला सूर्यास्ताचे फोटो मिळतील कि नाही या शंकेने स्वस्थ बसवेना. शेवटी न रहावून रोप-वे चे एक तिकीट काढून आलो. जर का ही मंडळी सहा वाजेपर्यंत आली नाहीत तर एकटंच पुढे जायचे असं ठरवून टाकलं. अखेरीस ६.१० ला मंडळाची बस आली आणि आम्ही रोप-वे ने रायगडाकडे सरकू लागलो.


वर पोहोचताच सोबतच्या मंडळींना तिथेच सोडून मी होळीच्या माळाकडे धावत सुटलो. तिथला नजारा तर शब्दात मांडता येणं शक्यच नाही. भान हरवून मी जागच्या जागी स्तब्ध झालो. सूर्यनारायण अस्ताला चालला होता. अवघा आसमंत सोनेरी रंगात न्हाऊन निघाला होता. निछ्चयाचा महामेरू श्री शिवछत्रपतींचा सिंहासनारुढ पुतळा त्या सोनसळी पार्श्वभूमीवर फारच मोहक दिसत होता. थोडं भानावर येताच पाठीवरची सॅक तिथेच टाकून झटकन माझ्या कॅमेर्‍यावर झूम लेन्स चढवली आणि त्या अविस्मरणीय क्षणांना बंदिस्त करण्याच्या मागे लागलो. बर्‍याच कोनातून जवळपास १५० फोटो घेतले. तरी मनाचे समाधान काही होईना. २०-३० चांगले म्हणावे असे फोटो मिळताच मी महाराजांच्या पुतळ्या मागच्या टेकाडावर चढून समोरच्या कचेर्‍यांचे (काहींच्या मते ती बाजारपेठ आहे) थोडे फोटो काढून नगारखान्याकडे वळालो.




आत शिरताच राज्याभिषेकाचा प्रसंग आठवून अंगावर काटा आला. हिच ती जागा जिथे महाराज छत्रपती झाले होते. याच जागी गागाभट्टांनी महाराजांवर पंचनद्यांतील उदकाने अभिषेक केला होता. सध्या शासनाने स्थापिलेल्या मेघडंबरीतील महाराजांच्या बैठ्या पुतळ्याचे काही फ़ोटो काढले आणि जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेकडे चालता झालो.

 

बाकीची मंडळी हळूहळू येत होती. चांदोरकर सर तर दोन दिवसापासून गडावरच होते. सगळी जमेपर्यंत ९ वाजत आले होते. सामुदायिक भोजनाचा कार्यक्रम आटपून मी, सचिन, ओंकार आणि काही मंडळी परत होळीच्या माळावर आलो. मला रात्रीच्या अंधारात कचेर्‍यांचे काही फोटो काढायचे होते. ४-५ फोटो काढून मी आणि ओंकार टेकाडावर गप्पा मारत बसलो. टिपूर चांदणं पडलं होतं त्यात पश्चिमेकडचा गार वारा आणि गडावरचं भारलेलं वातावरण या सगळ्यांचा सुंदर मिलाफ आम्ही अनुभवत होतो. तिथून उठायची इच्छाच होत नव्हती पण पहाटे ५.३० ला गडदर्शनासाठी निघायचे असल्यामुळे आम्ही धर्मशाळेत परतलो. दिवसभराच्या प्रवासात दमल्यामुळे झोप कशी लागलं कळले देखिल नाही.
सकाळी ५.०० ला उठून तयार झालो. धर्मशाळेसमोरच्या नळावर तोंड हात पाय धुवायला एकच झुंबड उडाली होती. उन्हाळ्याचे शेवटचे दिवस होते त्यामुळे जवळ जवळ कोरड्या पडलेल्या गंगासागर तलावाकडे मोर्चा वळविला. चांदोरकरांनी तलावातल्या गुहा आणि भूमीगत टाक्या दाखवल्या. नंतर देशमुखांकडे चहा पिऊन होळीच्या माळावर आलो. वर चढल्या चढल्या चांदोरकरांनी सगळ्यांना आपापली होकायंत्रे काढायला सांगितली कारण ते आम्हाला "मॅग्नेटीक फ़िल्ड" काय असते ते दाखवणार होते. चांदोरकर पुढे आणि सगळी होकायंत्रे मागे अशी जत्रा निघाली. माळावरच्या महाराजांच्या पुतळ्याच्या मागे उजव्य़ा हाताला टेकाडाच्या तळापाशी काही टाकी आहेत. हेच ते "मॅग्नेटीक फ़िल्ड" इथे होकायंत्राचा काटा एकदम १८० अंशाने बदलतो. आम्हा सगळ्यानांच फ़ार गंमत वाटली. थोडा वेळ मागे पुढे होत आम्ही "मॅग्नेटीक फ़िल्ड" ची मजा घेउन नगारखान्याकडे वळालो.

3 comments:

shrikant म्हणाले...

Awesome Amol... :)

मी मिलिंद .... म्हणाले...

nad khula bhava

Sangram म्हणाले...

सहीच........ नाद खुला सह्याद्री वेडा

टिप्पणी पोस्ट करा