१७ मे, २०१२

मी किल्ल्यांवर का भटकतो ... ?


खरं सांगायचं तर या उत्तराच्या शोधात मी सुद्धा आहे. त्यामुळेच हा प्रश्न विचारणार्‍या व्यक्तीबद्दल मला प्रचंड सहानभूती वाटते . आत्तापर्यंतच्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम मी या सह्याद्रीवर केलं, त्याच्या अंगाखांद्यावर पहुडलेल्या किल्यांवर केलं. (मला खात्री आहे माझ्या या विधानाचं, माझ्या बायकोलाही वाईट वाटणार नाही. ती ही माझ्यासारखीच भटकी आहे !) गेल्या सोळा वर्षांत अनेक किल्ल्यांच्या, घाटवाटांच्या अनेकदा वार्‍या केल्या. कोणताही किल्ला कितीही वेळा पाहिला असला तरी परत तिथे गेल्यावर तो वेगळाच का भासतो ? हे एक प्रकारचं गूढ आहे माझ्यासाठी.

सह्याद्रीच्या सगळ्या भेटी कायमच अविस्मरणीय असतात. वर्षांतले कित्येक दिवस मी भटकंतीच्या आखण्या करण्यात, नकाशे धुडाळण्यात, भटकण्यात, त्यांच्या चित्रमय आठवणीत घालवतो. हे मोजणंही हल्ली सोडून दिलं आहे. महिन्यात किमान तीनवेळा तरी सह्याद्रीत भटकावं असा अट्टाहास असतो. (प्रत्येक वेळेस तो पूर्ण होतोच असं नाही).

मनात येईल त्यावेळी, हाताला येतील त्या गोष्टी सॅकमधे कोंबायच्या आणि निघायचं. अनेकदा तर कुठे जायचं हे ही ठरलेलं नसतं, मग अशावेळी माझ्या सगळयात जवळच्या स्नेह्याकडे आपोआप पावले वळतात . तो स्नेही म्हणजे राजगड ! माझां सखां, जीवलग! अजूनही विशेषणे लावता येतील पण ती ही कमीच . त्याच्या सानिध्यात सगळ्या जगाचा विसर पडतो. शिवबांच्या हयातीतील उणीपुरी चोविस वर्षे पाहिलेल्या या राजगडाबद्द्ल प्रचंड जिव्हाळा तर आहेच पण थोडा मत्सरही आहे. अजूनही त्या इतिहासाचं अस्पष्ट अस्तित्व जाणवतं मला राजगडावर. पावसाळ्यातल्या शनिवार रविवारी शक्यतो राजगड, तोरणा, राजमाची, तिकोना, मढे घाट, गोप्या घाटात आमचा मुक्काम :)

राजमाचीशी माझी एका वेगळ्याच संदर्भात नाळ जोडली गेली आहे. गो.नि.दां ची "माचीवरला बुधा" ही राजमाचीवरची कथा वाचल्यापासून कमालीची अस्वस्थता होती. त्यानंतर तो बुधा कधीतरी दिसेल या भाबड्या आशेतून पंचवीस ते तीस वेळा राजमाचीवर वेड्यासारखा भटकलो. त्याच्या खोपटाच्या जागेजवळ अनेक रात्री जागून काढल्या. अजूनही मी राजमाचीवर जाताना तीच वेडी आशा बाळगून असतो. माचीवरच्या बुधाचा शेवट वाचताना अंगावर आलेला शहारा आणि त्याच वेळी डोळ्यात आलेलं पाणी अजूनही तितकंच अस्वस्थ करतं.

नक्की काय करतो मी या भटकंतीत ? कधी रात्री बारा-एक च्या सुमारास घर सोडून एस्.टी. पकडणं, कधी एस.टी. स्टँडवरच पथार्‍या पसरून सकाळच्या पहिल्या गाडीची वाट पहाणं, किल्ल्यांच्या वाटा हुडकणं, त्या बर्‍याचदा चुकणं, कधी कुठल्या गडाचे राकट कडे लांघणं, कधी घाटवाटांच्या गर्द झाडोर्‍यातून तळकोकणात उतरणं, कधी कोण्या तटावर पाय सोडून सैराट वारा छातीत भरणं, रायगडावरच्या सूर्यास्ताच्या एका नेमक्या क्षणासाठी दोन दोनशे फोटो काढणं, कधी एखादया अवखळ ओहोळावर पालथा पडून थंडगार पाण्याने तहान भागवणं, कधी कोसळत्या पावसात चिंब होणं, कधी कुठल्या ओढ्यात, डोहात यथेच्छ डुंबणं, पावसाच्या सरींचे कर्णमधूर संगीत चहाच्या घोटांसवे ऐकणं, कधी कुठल्या धूर भरल्या गुहेत चुलीवर काही बाही शिजवणं, कधी एखाद्या किल्ल्यावरच्या मंदीरासमोरील ओसरीवर उताणं पडून आकाशातलं चांदणवैभव न्याहाळणं, गडमाथ्यावर पोहोचल्यावर क्षत्रियकुलावतंसच्या घोषणेनंतर अंगावर आलेले शहारे अनुभवणं, रात्रीच्या शेकोटीसमोर बसून भूताखेतांच्या गोष्टी सांगणं, शिवथरघळीतल्या जलप्रपाताचे शिंतोडे झेलत मनाचे श्लोक म्हणणं, कधी कोण्या गडावर महाराजांच्या सदरेसमोर नतमस्तक होणं, कधी पावनखिंडीत बाजींच्या बलिदानाच्या स्मरणात नकळत गालावर ओघळलेले अश्रू पुसणं, कधी वैराटगडावर फुटलेल्या तोफगोळ्यांचे कपचे हुडकणं, कधी रात्रीच्या अंधारात राजमाचीची वाट तुडवणं, अन् कधी गो.नि.दां. च्या कादबंर्‍यांतील पात्रं आणि त्यांचे संदर्भ धुंढाळत फिरणं.. या सगळ्यातून काय मिळतं ?? समाधान! एक वेगळ्याच प्रकारचं, अनाकलनीय, गूढ आणि हे गूढ जितकं अनाकलनीय तितकंच जास्त आनंददायी आहे, हवंहवंस आहे, मनाची मरगळ दूर लोटणारं आहे.

पण तरीही मी म्हणेन की , मी किल्ल्यांवर का भटकतो याचं उत्तर अजूनही शोधतोच आहे. आणि मला ते इतक्या सहज मिळू नये असंच वाटतं, जेणेकरून माझ्या भटकंतीत कधीही खंड पडणार नाही !
--
अमोल नाईक (जातीवंत भटका)

13 comments:

Trekography म्हणाले...

मस्त रे अमोल... या प्रश्नाचे उत्तर कोणत्याही भटक्याला सापडले असेल आणि कधी सापडेल असे वाटत नाही.

रोहन बिड्कर म्हणाले...

काही गोष्टी फक्त अनुभवायाच्या असतात. बघून , फिरून , पाहून , आणि हो, वाचून सुधा..
असेच काही तरी वाटले हा ब्लॉग वाचून.

मंदार पांडे म्हणाले...

अगदी बरोबर बोललास बघ रोहन , आणि अमोल दादा, लई भारी लिहील आहेस तू . आवडलय !

अनामित म्हणाले...

:)

अमोल नाईक म्हणाले...

धन्यवाद मित्रहो !

Pankaj - भटकंती Unlimited म्हणाले...

फार सुंदर लिहिलंय हे. मी शेअर करतोय. मागे मीही असंच काही लिहिले होते. त्याची ही लिंक:

http://goo.gl/PKqDG

वृंदाली.. म्हणाले...

Mast.. :) tuzaysobat ek tari trek karayla milala he maze bhagy,ani ata yetya pavsalyat nakkich aapla ek trek tari kamit kami hoilch.. ek gosht ithe namud karavi vatte ki amol nusti bhatkanti nahi karat tar tithalya paythya lagtchya gavatlya lokanna arthik an vaidyakiy madat puravato hi gosht mala far avadtae.. :)

Prashant म्हणाले...

farch uttam asa lekh aahe aapla.. mala aawdel aapla group join karayala.. tumhala kasa contact karawa..

मंजुश्री बनकर म्हणाले...

pharach bhari :-) kaharch yaa prashancha uttar miluch shakat nahi !!

Pranav Sahasrabudhe म्हणाले...

मस्तच रे अमोल... जुन्या आठवणी ताज्या केल्यास...

surendra kulkarni म्हणाले...

aare tula jar ka yaache uttar milale tar tu bhatkanti karnarch naahi mitra....
aani khar sangaye tar tu yaache uttar shodu pan nakos.....kaaran kuni tari mahntle aahe na "adnyanatch sukh aaste"
best luck for your next treak
will miss u all
surendra

Vasudha म्हणाले...

अप्रतिम..

अमोल नाईक म्हणाले...

धन्यवाद मंडळी !

टिप्पणी पोस्ट करा