कोसळत्या सरींचा राजमाची
शनिवार रविवार राजमाची !!! म्हणताच ब-याच मंडळींची नावे आली होती पण त्यातले १३ मावळेच शब्दाला जागले होते त्यात मी, लकी प्रशांत, राहूल-वसुधा(दांपत्य), शितल जाधव, श्रीकांत, अभिजीत अशा जुन्या मंडळींसोबत विजया, अश्विनी, प्रसाद, महेश आणि शितल ( नावावर जाऊ नका हा मुलगा आहे ) अशी नवी मंडळीही होती. पहाटे ६.३० ची लोकल पकडून लोणावळा गाठायचे असे ठरविले होते. पण कुंभकर्ण लकी आणि दरवेळी उशीर करण्यात पटाईत असलेला प्रशांत यांच्यामुळे ६.३० आणि ८.०५ या दोन्ही लोकल गमावून आम्ही लाल डब्याला शरण गेलो. ८.४० ची फ़लटण-मुंबई गाडी पकडून १०.३० ला लोणावळ्यात पोहोचलो. एस.टी. स्टॅंडवरच नाश्ता उरकून तुंगार्ली धरणाची वाट धरली.
पुण्यातूनच पावसाला सुरुवात झाली होती आणि त्याचा जोर वाढतच चालला होता. कंटाळवाणा डांबरी रस्ता संपून एकदाची तुंगार्लीची भिंत लागली. सुट्टीचा दिवस असल्याने धरणावर बरेच पर्यटक दिसत होते. आमच्या सोबत राजमाचीकडे जाणारेही बरेच लोक होते. धरणाच्या आसपासची रिसॉर्ट्स सोडून आम्ही पुढे निघालो आणि मला आमच्याच लोकांचा आरडाओरडा ऐकू आला. मागे बघतो तर मिस. शितल आणि प्रशांत अक्षरशा: लहान मुलांसारखे रस्त्यांवरच्या डबक्यातलं चिखलपाणी एकमेकांच्या आणि इतरांच्याही अंगावर उडवत होते. उगीच त्यांना खोटाखोटा रागावून मी आपली दादागिरी सिध्द करायचा प्रयत्न करताच त्या दोघांनी माझ्या अंगावरही यथेच्छ चिखल उडवला.थोड्या वेळाने अश्विनीही त्यांना सामील झाली.
राजमाचीकडे जाणारी ती ओली पायवाट धुक्याची दुलई पांघरून बसली होती. पाऊस मन मानेल तसा कोसळत होता. एखाद्या वा-याच्या झोताबरोबर धुके बाजूला होताच खंडाळ्याच्या बाजूच्या दरीचे विहंगम दृश्य मनाला भुरळ घालत होतं. याच ठिकाणी कायमचे वास्तव्यास यावे असे राहून राहून वाटत होते. गो.नि.दां.च्या प्रसिध्द झालेल्या "माचीवरला बुधा" कादंबरीतील संदर्भ डोळ्यासमोरून सरकत होते. त्या कादंबरीचा नायक बुधा अचानक समोर आला तर ??? असा पुसटसा विचार मनाला चाटून गेला आणि कथेचा शेवट आठवताच अंगावर शहारे आले. कादंबरीतून परत वास्तवात आलो आणि मुकाट पायाखालची वाट तुडवू लागलो.
जाताना लागणारा छोटासा घाट उतरल्यावर डाव्या हाताला एक सुंदर धबधबा लागला. लगेचच सगळे त्या दिशेने धावात निघाले. ब-याच प्रयत्नांने मी त्यांना, पुढे अजून सुंदर जागा आहेत !! असे सांगून पुढे दामटले. थोडी नाराजी व्यक्त करून जनता पुढे निघाली. त्यानंतर येणा-या प्रत्येक धबधब्याला आणि ओढ्याला त्यांनी "अमोल ~!! अमोल ~!!" अशा आरोळ्या देत माझाविरूध्द निषेध नोंदवला. राहूल आणि वसुधा हे दांपत्य आपल्याच नादात मागे मागे रेंगाळत होतं. त्यामुळे सगळ्यांना क्षणभर का होईना पण विश्रांती मिळत होती. राजमाचीहून दिसणारा प्रसिध्द कातळधार धबधबा जिथून सुरु होतो त्याजागी आम्ही पोहोचलो. तिथल्याच एकुल्या टपरीत चहा घेऊन पुढे निघालो.
पावसाने सगळ्यांना झोडपून काढायच ठरवलं होतं बहुदा, त्याचा जोर वाढतच चालला होता. त्या धुकट आसमंतात हिरव्या रंगाची झालेली मुक्त उधळण डोळ्यांचे पारणे फ़ेडत होती.वाटेत एक मोठ्ठा ओढा आडवा आला. यावेळेस मात्र मी कोणाला थांबवायचे धाडस केले नाही, नाहीतर या जनतेने मला हाणून काढले असते. लकी, प्रशांत, श्रीकांत, मिस. शितल, शितल्या आणि दांपत्य खांद्यावरच्या सॅक टाकून पाण्यात पळाले. एकमेकांच्या अंगावर यथेच्छ पाणी उडवून झाल्यावर मंडळी पुढचं मार्गक्रमण करु लागली
.
वाटेत लागणारे अगणित ओढे आणि धबधबे एखाद्या मोहजालाप्रमाणे आम्हाला खुणावत होते पण उधेवाडीत वेळेत पोहोचायचे होते त्यामुळे आम्ही त्यास बळी न पडता आम्ही उधेवाडीकडे सरकत होतो. विजया आणि वसुधा दर पंधरा मिनिटांनी "अजून किती राहीलं आहे ??" असा प्रश्न विचारीत होत्या आणि मी त्यांना "आता आलंच .... पंधरा मिनिटात ...." हे माझं ठरलेलं उत्तर देत होतो. अखेरीस साडेचार तासांनी उधेवाडीची वेस आली आणि महिला मंडळाचा जीव भांड्यात पडला. आता मात्र पावसाने चांगलाच जोर धरला होता. तोंडावर तर अक्षरशा: असंख्य सुया टोचल्याचा भास होत होता. शेवटच्या टप्प्यात असलेला चिखलाचा डोह पार करून आम्ही जिथून कातळधार धबधबा दिसतो त्या ठिकाणी आलो. थोडं पुढं जाताच तो मनोहारी धबधबा आपले रौद्ररुप दाखवत होता. तिथल्याच टपरीवरच्या उंबरेंकडुन कळालं की आम्ही किती भाग्यवान आहोत ते !!! सकाळ्पासून सुमारे १५०-२०० लोकं इथून गेली होती पण दरीत साठलेल्या धुक्यामुळे कोणालाच त्या धबधब्याचे दर्शन झाले नव्हते. तिथे थोडे फोटो काढून आम्ही तुकाराम उंबरेच्या घराचा मार्ग धरला. अरे हो सांगायचे राहीले .... या उधेवाडीत उंबरे कुटुंबीयांची संख्या लक्षणीय आहे. दरवेळेस मी ज्या तुकाराम उंबरेकडे उतरतो त्याला मी पुण्यातूनच फ़ोनकरून आगाऊ कल्पना दिली होती त्यामुळे आमचा राहण्याचा अणि जेवणाचा प्रश्न मिटला होता. मुक्कामी पोहोचण्यास नियोजित वेळेपेक्षा उशिर झाला होता म्हणून मनरंजन बालेकिल्ला पहायचा बेत आम्ही रद्द केला.
सलग ५ तास चालून मंडळी भलतीच दमली होती. अंगावरचे ओले कपडे बदलून आम्ही जेवण उरकले आणि फ़ावला वेळ सत्कारणी लावण्यासाठी "डम्ब शेराज" चा खेळ सुरु झाला. जनतेची दोन टिम मधे विभागणी झाली. आणि एकेकाची एक्टींग पहाता पहाता सगळे हसून हसून गडाबडा लोळत होते. प्रशांतने तर उच्छाद मांडला होता. त्याच्या मते तो एक्टींगचा बादशहा होता !! त्याच्या या वाक्यावर परत लोक पोट धरधरून हसले. तेवढ्यात तुकारामच्या भावाने आमची जेवणाची ताटं लावायला घेतली. गरम गरम तांदळाच्या भाकरी, भाजी, आमटी-भात आणि पापड असा भन्नाट मेनू होता. यथेच्छ हादडी झाल्या मंडळी पेंगू लागली होती. तरी अंताक्षरीचा मोह काही जणांना आवरता आला नाही आणि मग रात्री २ पर्यंत गाण्यांची मैफ़िल रंगली होती.शेवटी मी थोडा दम भरल्यावर सगळी शांत झाली.
सकाळी सात वाजता पोटोबाला चहा पोह्यांचा नैवेद्य देऊन आम्ही श्रीवर्धनकडे निघालो. वाटेतल्या गुहा पाहून भैरोबाच्या मंदीरापाशी आलो. दर्शन घेउन श्रीवर्धनच्या पाय-यांकडे सरकलो. महादरवाज्यातून आत शिरताच समोरच्या पायवाटेवर चांगलं ३ फ़ुट खोल आणि जवळ्पास २० फ़ुट लांब पाण्याचा चर तयार झाला होता. तो पार करुन आम्ही किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर गेलो पण दुर्दैव !! सगळीकडे दाट धुकं आणि मुसळधार पाऊस असल्यामुळे आम्हाला काहीच पहाता आले नाही.
गेला दिड दिवस आम्ही राजमाचीच्या कुशीत होतो. वेळ कसा गेला कळालेसुध्दा नाही. परतायची इच्छा नसतानाही चाकरमानी पावले सिमेंटच्या जंगलाकडे चालू लागली. लोकलमधून परत येताना डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा राजमाचीच्या आठवणी नाचत होत्या. दरवर्षी प्रमाणे यंदाच्याही राजमाची ट्रेकने धम्माल आणली होती आणि यावेळेसही माचीवरला बुधा भेटेल ही वेडी कल्पना अपुर्णच राहीली ....
---
अमोल नाईक.
7 comments:
By looking at photos and description,it must be awesome.
Zakas varan kele ahes!!!!
HOW SHOULD I JOIN WITH THIS GROUP MAM
machivarchya budhala nkki kay prachiti yet asel??? nkki kasli odh asel?? ..... he sagle tithe gelyavarch kalat asve umjat asave bahudha......
हो, एकदा तरी ती कादंबरी वाचून राजमाचीला जावं ..
काहीही झाले तरी मी PG साठी पुणे मधेच प्रवेश घेणार न तुला सोबत करणार...
मला तुझा फार हेवा वाटतो अमोलदा...
चैनी करा तू छायाचित्रकार तसेच लेखक पण आहेस हान...
धन्यवाद आशिष !
टिप्पणी पोस्ट करा