सह्याद्री डोंगररांगांच्या पूर्वेला दख्खनचं पठार आणि पश्चिमेस कोकण ! या कोकणातून वर देशावर येण्यासाठी पुरातन काळापासून अनेक घाटवाटांचा वापर केला जात असे. सह्याद्रीतल्या याच घाटवाटांची माहिती, त्यांचं भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्व आपण या लेखमालिकेत पाहणार आहोत. सुरुवात करूया मढे घाटापासून. या घाटाचे नाव मढे घाट पडण्यास तसे कारणही आहे. कोंढाण्यावर म्हणजे आत्ताच्या सिंहगडावर उदयभानाच्या मोगल सैन्याबरोबर झालेल्या तुंबळ लढाईत शिवबांच्या स्वराज्याचा एक महत्त्वाचा शिलेदार तानाजी मालूसरे धारातीर्थी पडला. मराठ्यांनी गड जिंकला; पण तानाजीला या लढाईत वीरमरण आले. या तानाजी मालुसरेंचं मूळ गाव तळकोकणातील पोलादपूरनजिकचं उमरठ. त्यांचं पार्थिव कोंढाण्याहून कोकणात नेताना केळद गावाजवळील या घाटरस्त्याचा वापर केला गेला. तेव्हापासून या घाटाला मढे घाट म्हणून ओळखलं जातं.
पूर्वी या वाडीवर येण्यासाठी फक्त पायवाटाच होत्या. एक केळदहून मढ्या किंवा उपांढ्या घाटातून आणि दुसरी खाली तळकोकणातील रानवडी गावातून. पण अलीकडेच रानवडीहून कर्णावडीपर्यंत कच्चा रस्ता झाला आहे. या कर्णावडीतील मुले माध्यमिक शिक्षणासाठी खाली रानवडीतील शाळेत पायी जातात. कर्णावडीत मुक्काम करायचा झाल्यास तिथली शाळा हा एक उत्तम पर्याय आहे. काही भटकी मंडळी मढ्या-उपांढ्या किंवा मढ्या-शिवथरघळ-कावळ्या किल्ला अशा भटकंत्या करतात. निश्चितच मढे घाट सर्वच ऋतुंमधे सह्याद्रीतल्या निखळ भटकंतीचा आनंद देऊन जातो.
केळद गावातून मढे घाटाकडे जाणारी वाट
पुण्यापासून अदमासे ७० किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरच्या केळद गावाजवळ हा घाट आहे. मढेघाटात जाण्यासाठी पुण्याहून दोन मार्ग आहेत. एक पुणे-सातारा रस्त्यावरील नसरापूर फाट्याहून उजवीकडे वळून वेल्ह्याला जाणारा आणि दुसरा खडकवासला धरणामागच्या खानापूरहून डाव्या हाताला पाबे गावाकडून वेल्ह्याला येणारा. दोन्ही रस्ते पाबे गावाजवळ एकत्र होऊन वेल्ह्यात येतात. वेल्ह्याच्या बाजारपेठेतून डाव्या हाताचा रस्ता आपल्याला केळद गावाकडे घेऊन जातो. वाटेत कानंदीचं खोरं, भट्टी, पासली ही गावं सोडून आपण केळदला येऊन पोहोचतो. केळद गाव पूर्वी अन्नछत्र नावाने ओळखले जायचे. त्याकाळी घाट चढून येणार्या पांथस्थांची क्षुधाशांती करण्यास येथे अन्नछत्र चालायचे. केळद गावातून दीड-दोन किलोमीटर पायपीट केल्यावर आपण मढे घाटाच्या तोंडाजवळ येतो.
घाटमाथ्याहून दिसणारं तळकोकण
घाटमाथ्यावरून खाली तळकोकणातील लहानलहान कौलारू घरांचे पुंजके लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यात मढेघाटाच्या कड्यावरून एक अजस्त्र जलप्रपात कोसळत असतो. हिरवाईने नटलेला घाट पावसाळ्यात अधिकाधिक नयनरम्य होत जातो. इथेच एका खळाळणार्या ओढ्यातूनच घाटात उतरणारी वाट आहे.
घाटात कोसळणारा धबधबा
गर्द वनराईतून जाण्यार्या या वाटेवर काही दगडी पायर्या प्राचीनतेची साक्ष
पटवत राहतात. पुढे ही घाटवाट मधल्या टप्प्यातल्या एका छोटेखानी पठारावर
उतरते. या पठारावर डाव्या बाजूला २-३ किलोमीटरवर कर्णावडी नावाची एक छोटी
वाडी आहे. या गावात चौथीपर्यंत शाळादेखील आहे.
कर्णावडीतील शाळा
धुकाटात हरवलेली कर्णावडी
पूर्वी या वाडीवर येण्यासाठी फक्त पायवाटाच होत्या. एक केळदहून मढ्या किंवा उपांढ्या घाटातून आणि दुसरी खाली तळकोकणातील रानवडी गावातून. पण अलीकडेच रानवडीहून कर्णावडीपर्यंत कच्चा रस्ता झाला आहे. या कर्णावडीतील मुले माध्यमिक शिक्षणासाठी खाली रानवडीतील शाळेत पायी जातात. कर्णावडीत मुक्काम करायचा झाल्यास तिथली शाळा हा एक उत्तम पर्याय आहे. काही भटकी मंडळी मढ्या-उपांढ्या किंवा मढ्या-शिवथरघळ-कावळ्या किल्ला अशा भटकंत्या करतात. निश्चितच मढे घाट सर्वच ऋतुंमधे सह्याद्रीतल्या निखळ भटकंतीचा आनंद देऊन जातो.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा