२० जून, २०१२

चंदन-वंदन - पावसाची पहिली भेट

जूनचं पहिलं दोन आठवडं गेलं तरीबी  पावसाचा तप्पास नव्हता. कोल्हापूरात कवा धरनं घुटमळत्योय पन पुन्याकडं सरायचं काही नाव नाय पठ्ठ्याचं. त्यो इतका रग्गेलपना दावतोय तर म्या म्हनलं, या बारीला आपणच जावं सातार्‍या पतुर ! चंदन - वंदन वर जाऊन लई दिस झालं होतं तवा या बारीला त्यांना भेटायचं नक्की क्येलं. पावसाचीबी गाठ पडायला म्हनलं तेव्हडचं निमित.

 बेलमाची गावातून दिसणारा चंदन किल्ला
चंदन-वंदन मधलं बेचकं
पायथ्याचं मंदीर, मागे वंदन गडाचा पसारा
दुपारला अडीचला पुनं सोडलं आन् गाड्या भुईंज कडं हाकल्या. आवंदाच्या टायमाला आमच्या मंडळी त्यांच्या धाकल्या बहीनीसंगट आल्या व्हत्या. आप्पांच्या गावचा म्हंजी तळेगावच्या जोश्यांचा हृषीकेश होता, श्रीकांत त्याच्या कुटुंबाला घेऊन हाजीर व्हता आनी पुन्यातूनच वृंदा आनी मैत्रयीनी वर्दी दिली व्हती. शिवापूरला च्या पिऊन घेतला आन गाड्यातनी तेलं भरून घेतली. पुढला च्या वाई फाट्यावर घ्येतला. भुईंज मधून गाड्या डाव्या अंगाला बेलमाची गावाकडं जानार्‍या वाटंवर घातल्या न घातल्या तोच पावसाची बारीक सर आली. पठ्ठ्या अखेरीस भेटलाच तर ! गाड्या  वरच्या बेलमाचीत लावल्या अन् सरल खिंडीकडं निगालो. समदी मंडळी फोटू काडत काडतच चालली व्हती. 
 फोटू सेशन
मावळतीच्या अंगाला वैराटगड डोस्कं ढगात टाकून बसला व्हतां. कदी मदी त्याच्या टकूर्‍यावर मावळतीचं सोनं दिसत व्हतं. त्याच्या मागल्या बाजूनं महाबळेशराचं पठार. लैच झ्याक नजारा ! तिथंन पावलं काय निघना. मदीच आभालाच्या घोंगडीला भोकसं पडून त्यातनं सुर्व्याची किरनं जिमिनीवर सांडत व्हती. फोटू काढत अन् करंवंद खात खात चंदन-वंदनच्या मधल्या टापावरं पोचलो. 
 वैराटगड अन् आजूबाजूला सांडणारी किरणे
 आभाळाला पडलेली ठिगळं
  आभाळाला पडलेली ठिगळं
 मावळतीच्या सोनसळी रंगात न्हाऊन निघालेलं बेलमाची
 वैराटगडावर पसरलेलं मावळतीचं सोनं
वंदनची वाट तर लगेच घावली. चंदनकडं जानारी वाट गडाच्या भिताडाला वळसा मारून जानारी व्हती. म्या अन् श्रीकांतनं थोडं म्होरल्या अंगाला जाऊन बघितलं, पर लैच घसारा ! म्हागारी फिरलो. अंधारायला झालं व्हतं तवा बिगी बिगी पावलं उचलीत वंदन गडावरला दर्गा गाठला. भणाभणा वार्‍याचं फटकं बसत व्हतं अन् पाऊस उगा गोमुत्र शिंपडल्यावानी पडंत व्हतां. 
 चंदनच्या डोक्यावर चाललेला ढगांचा खेळ
 मपलं बारदान अन् मागं चंदनचा कडा
 वंदनचा बुरूज
 अखिल डोंगरयात्रा महिला मंडळ - एका मावळत्या क्षणी
 चंदन जवळच्या टापावरून दिसणारा वंदनचा पसारा
 श्रीकांत एका निवांत क्षणी (फोटो : हृषीकेश जोशी )
 चंदनची वाट शोधाताना मी आणि श्रीकांत
दर्ग्याच्या अंगनात, घरनं बांधून आनलेलं जेवान सोडलं आनिक समदी खान्यावर तुटून पडली. कवाधरनं पोटात कावळं वरडत व्हते. समदं संपवून नवाच्या काट्याला सगळी दर्ग्यात पार आडवी ! मंग आमच्या मंडळींच्या आर्जवावर गान्याच्या भेंड्या सुरू झाल्या. दोन तीन घंटे गळे फाटूस्तवर आम्ही आरडत व्हतो. पावसाचा शिडकावा अन् भनाननारा गार वारा ! थंडी लागली नाय तर नवल ! सगळी मंडळी गप गुमान पडली.
 वृंदाने काढलेला हादडीचा फोटो
पहाटं पाचच्या टायमाला म्या सुमडीत दर्ग्यासमोरल्या तळ्याकडं बसून आलो. लईच काकडं भरलं व्हतं. सातला मंडळी उठली अन् धुकाटातच मागल्या कड्यावरं जमली. ढगांची लै दाटी झाली व्हती. उगवतीला चंदनच्या अंगाखाद्यावरून मधल्या खिंडीत येत ढगांच्या आंघुळी चालल्या व्हत्या. दोन चार पवनचक्क्या पल्याडल्या टापावरून आपल्या माना वर काढून हा सारा खेळ न्याहाळीत व्हत्या. ढगांवर मधिच सूर्व्याची किरणं पडून चमकित व्हती. सकाळ्च्या पारी लैच झ्याक दिसत व्हतं सारं. फोटू काढून सामानाची बारदानं बांधली. 
 ढगांचा खेळ
 ढगांमधून माना वर काढून पहाणार्‍या पवनचक्क्या
 :)
  ढगांमधून माना वर काढून पहाणार्‍या पवनचक्क्या
 चंदन-वंदनच्या मधल्या बेचक्यात तयार होणारे ढग
  ढगांमधून माना वर काढून पहाणार्‍या पवनचक्क्या
 धुकाटात हरवलेला वंदनचा बुरूज
गडावर प्यायच्या पान्याचा ठनठनाट व्हता तवा च्या खाली गावातच घेनार व्हतो. बारदानं पाठीला मारून गडावरच्या धुकाटात शिरलो. अजून एक भली थोरली दर्ग्यागतच इमारत पाहिली. एक तीन दरवाज्याचं बैठ कोठारबी हाय. पर दरवाजात लैच गचपण माजलं व्हतं. एका दरवाजातून आत डोकावलो तर वाघळाच्या मुताच्या वासाची घान उठली होती. तसाच मागं फिरलो एक दोन फोटू काढलं आन परतीच्या वाटेवर निघालो. वाटेत अजून एक दोन तळी लागली. अन् पडक्या वाड्यांची जोती बी दिसली. महाराजांच्या काळात गडावं मोप राबता असनार. दरवाजाकडं दगडी जिनं उतरतं झालो. वरच्या दरवाज्यावर एक फारसी भासेतला शिलालेख घावला. आतमदी पहारेकर्‍याच्या देवड्याबी हायेत. त्यामधूनच वरच्या बुरजावर जायला भिताडातून एक बोळकांडं आहे. त्याच्याबी तोंडावर लैच गचपण. खालच्या ढासळलेल्या तटबंदीतून दरवाज्याकडं गेलो. या दरवाज्यावर मात्र गणेशाची मूर्ती अन् कमळं कोरली व्हती. फोटू काढलं अन बेलमाचीची वाट धरली.
 रानभुली
 दर्ग्यासमोरच्या तळ्याकडे जाणारी कमान

 रानभुली
 अजून एक दर्गा
 रानमेवा-डोंगरची मैना
 कोठारं
 रानभुली
 दगडी पायर्‍या
 पहारेकर्‍यांच्या देवड्या
 दरवाजा
 फारसी शिलालेख
 दरवाज्याची कमान
 दरवाज्याजवळच्या बुरूजावरील गणेश मुर्ती आणि कमळ

 डोंगरयात्राचे शिलेदार
माझ्या जिवाभावाच्या मैतराशी भेट झाली अन् जीवाला कशी शांतता लाभली व्हती. आम्हास्नी सोडाया पार पुन्यापत्तुर साथ केली पावसानं. पावसाची सुरूवात तर लैच झ्याक झाली हाय. आता म्होरल्या भटकंतीचे बेत आखाया आम्ही मोकळं !

७ जून, २०१२

दीपोत्सव किल्ल्यांवरचा !

दीपोत्सव किल्ल्यांवरचा !

 राजगडावरील दीपोत्सव

दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप- आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ आणि या दिव्यांचा उत्सव म्हणजेच दीपोत्सव !!!

रायरेश्वरावरील दीपोत्सव

पूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा सह्यगिरीतील किल्ल्यांवर माणसांचा राबता होता त्यावेळी गडांवर नक्कीच दीपावली साजरी होत असणार यात शंका नाही. त्यावेळचे गडवैभव नक्कीच डोळ्यांचे पारणे फ़ेडणारे असेल. या गडकोटांनाही वाटत असेलच की पुन्हा पहावी तशीच दिवाळी !!
याचसाठी गडांच्या भूतकाळात दडलेल्या स्म्रृतींना उजाळा देण्यासाठी डोंगरयात्रा ट्रेकिंग क्लबची दिवाळी दरवर्षी सह्याद्रीतील एखाद्या किल्ल्यावर साजरी होते.

घरचं लक्षीपूजन उरकलं की पावलं आपसूक सह्याद्रीकडे वळतात ते याच दीपोत्सवासाठी. थोडा फराळ, एकवेळचा डबा, आकाशकंदील, तीन-चारशे पणत्या,२ लीटर गोडं तेलं, वातींचं बंडल, आणि प्रसादासाठी मोतीचूराचे लाडू इत्यादी सामानाची खरेदी उरकून सूर्यास्तापूर्वी गडावर पोहोचायची लगबग असते.
गडावर पोहोचल्यावर सगळी मंडळी आपापल्या कामाला लागतात. कोणी मंदिर झाडून घेतो, तर कोणी अंगणात सडे टाकतो, कोणी वाती वळायला लागतो तर कोणी पणत्यांची मांडणी करतो, कोणी तेल भरण्याची जबाबदारी घेतो. उत्साही महिला मंडळाची रांगोळ्यांची तयारी चालू असते. मुख्य गाभार्‍यासमोर घातलेल्या मोठ्या गालिच्यापासून ते अगदी प्रत्येक पणतीभोवती घातलेली सुरेख नक्षी वातावरण मंगलमय करून सोडते. कोणाच्या तरी मोबाईलवर मागे मंद आवाजात बिस्मिल्लाची सनई सुरू असते. गडदेवतेसमोर धूपदीप लावले जातात. वातावरण एकदम उत्साहपूर्ण आणि प्रसन्न असते. मंदिर आणि परीसरात सगळीकडे पणत्या लावल्या जातात. पारंपारीक पेहरावात मग गडदेवतेची आरती होते. सगळीकडे मंत्रमुग्ध करणारं आणि काहीसं भारावून टाकणारं असं वातावरण असतं.

 तिकोन्यावरील दीपोत्सव
या मंगलमयी सोहळ्यात कधी गडावरील किल्लेदार, गावकरी, पायथ्याच्या गावातली मंडळी कधी गडावरची ट्रेकर मंडळी आवर्जून सामील होतात. राजगडावरील किल्लेदार ढेबे, रायरेश्वरावरचा दगडू जंगम, तिकोन्याचं वसंता बोडकेचं  कुटुंब ही काही उल्लेखनीय नावं. त्यांना या सोहळ्याचं फार कौतुक !  दरवर्षीचा दीपोत्सव रायरेश्वरावरंच व्हावा हा दगडूचा निरागस हट्ट !


जेवणं झाल्यावर रंगतो गप्पांचा फड आणि मग मागील दिवाळीच्या आठवणीत मंडळी रमून जातात. शिवकल्याण राजातील गीतांची आवर्तनं होतात. किल्ल्याच्या इतिहासाची माहीती आणि महती जमलेल्या उपस्थितांना दिली जाते. पुढल्या वर्षीच्या दीपोत्सवासाठी एखाद्या नवीन किल्ल्याची निवडही तिथेच होते.


ह्या सगळ्यातून काय मिळतं ? तर उत्तर एकच, आत्यंतिक समाधान ! या गडकिल्ल्यांशी जोडली गेलेली नाळ अधिकाधिक दृढ होते, ते अशाच सगळ्या सोहळ्यांमुळे. या सगळ्यातून मिळाणार्‍या समाधानाची तुलना अन्य कश्या सोबत होणं निव्वळ अशक्य आहे !!

टीपः ई-शिवसह्याद्री मासिकात पूर्वप्रकाशित
अमोल नाईक
९८८१४९३३०३

१ जून, २०१२

थंडीची पहिली भेट - रोहीडा

थंडीची पहिली भेट - रोहीडा



१ ऑक्टोबर २०१०, शुक्रवार, ऑफिसमधली कामं आटपून घरी यायला रात्रीचे १२ झाले आणि तेव्हाच दुस-या दिवशीच्या जीवधन-नाणेघाटाच्या ट्रेकची नकारघंटा वाजली. अखेरीस शनिवारी संध्याकाळी किल्ले रोहीडाला मुक्कामास जाण्याचे नक्की केले. ऑक्टोबर हीट सुरु झाली होती म्हणून रात्रीच किल्ला चढायचं ठरवलं होतं. दुपारचे ४ म्हणता म्हणता निघायला ५.३० झाले. यावेळेस विजया आणि दिपकने उशिर केला. राहूल अगदी आयत्यावेळी गोटात सामिल झाला होता. अभिजीतने प्रणव,परेश आणि पल्लवी अशा ’प’ प्रारंभी सहस्रबुद्धे कुटुंबास निमंत्रित केलं होता. अभिजीतची सहस्रबुद्धेंच्या सॅंट्रो (मला त्या गाडीला पॅंट्रो असं म्हणावस वाटलं) मधे सोय झाली होती. मी-वैशाली(साली), दिपक-विजया, राहूल-वसुधा आणि प्रशांत असे आम्ही सातजण बाईकवर होतो. ६.०० च्या सुमारास आम्ही भोरच्या दिशेने निघालो. वाटेत पेट्रोल भरायला म्हणून थांबलो आणि तिथल्या मॅकडोनाल्ड्मधे रात्रीचा डबा घ्यायचे ठरवले. तिथे गेल्यावर कुणाला कोकाकोलाचे कुणाला डॉमिनोच्या पिझ्झ्याचे तर कुणाला CCD च्या कोल्ड कॉफ़ीचे डोहाळे लागले. परत मॅकडोनाल्डमधे कधीच यायला मिळणार नाही या भावनेने प्रत्येकाने भरमसाठ बर्गर पार्सल घेतले.(काही जणांनी मॅकपफ़हि घेतले होते). मी माझी नेहमीची ब्लॅक कॉफ़ी (विदाउट शुगर) घेऊन बाहेर येउन थांबलो होतो. राहूल-वसुधा दांपत्य कोणता तरी पाईनॅपल पिझ्झा चोपण्यात मग्न होतं. अभिजीत त्यांच्या मदतीला गेला नसता तर अजून अर्धा तास तरी तिथेच गेला असता. तो वेळ सत्कारणी लावावा म्हणून की काय, विजया CCD मधे कप्पा-निर्वाणा कि कसली कॉफ़ी घेऊन आली. त्याच्यावर तरंगणारं फ़्रेश क्रिम अर्ध्याहून अधिक अभिजीतनेच संपवलं. टिमचा वेळ वाचवण्यासाठी केलेल्या या मौल्यवान कामगिरीबद्दल मला अभिजीचा अभिमान वाटला (अर्थात त्याला विजयाने थोड्याफ़ार शिव्या दिल्या पण त्या फ़्रेश क्रिम समोर त्याला त्या फ़ारच शिळ्या वाटल्या असणार यात वाद नाही).
पुढचा थांबा होता भोरचं S.T. स्टॅंड !! तिथे चहासाठी थांबलो असतां, कावळ्या वरंधा करून पुण्याकडे येणा-या माझ्या काही दुर्गमित्रांची भेट झाली. गप्पाटप्पा झाल्यावर मोर्चा बाजारवाडीकडे वळवला. बाजारवाडी हे रोहीड्याच्या पायथ्याचे गाव. बाईकवर बसून आलेली मरगळ रोहीड्याच्या अंधूकशा दर्शनाने चालती झाली. बाजारवाडीच्या शाळेमागून एक मळलेली पायवाड गडावर जाते. गावातून बाहेर पडून जरा उंचीवर आल्याआल्या थंडगार वार्‍याच्या झोताने एकदम शहारा आला. थंडीची चाहूल लागली होती. पण नुकत्याच जीर्णोद्धार केलेल्या रोहिडमल्लाच्या मंदीरात आमचा मुक्काम पडणार होता, त्यामुळे मी निर्धास्त होतो. पण वर पोहोचल्यावर आमच्या नशिबी काय वाढून ठेवलंय, याची सुतराम कल्पनाही माझ्या मनाला शिवली नव्हती. इकडे जनता निवांतपणे रोहीड्याची वाट तुडवत होती. रात्रीचे ११.०० वाजले होते. भोर आणि आजूबाजूच्या गावातले सोडीयम व्हेपरचे दिवे आपापले अस्तित्व दाखवत होते. शितल चांदण्यात पायवाट तुडवताना, घामेजल्या चेहर्‍यावर गार वार्‍याचे सुंदर झोत येत होते. अत्यंत मोहवून टाकणारं वातावरण होतं. मधेच एका पठारावर थांबून तिथल्या हिरवळीवर जनता चक्क आडवी झाली आणि मग आकाश दर्शनाचा कार्यक्रम सुरु. कोणी आकाशात दिसणार्‍या विमानांच्या दिशांवरून ते नक्की चेन्नईला चाललं आहे की बंगळूरूला याच्याबद्दल चर्चा झाडत होतं. तर कोणी मृगाला शोधत होतं. बर्‍याच वाटाघाटींनंतर आपल्याला रात्रीच गडावर जायचे आहे, यावर जनतेचे एकमत झाले आणि पुढची वाटचाल सुरू झाली. अखेरीस १२.३० च्या आसपास गडाचे प्रवेशद्वार लागले. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजव्या हाताला एक पाण्याचे बारमाही टाके आहे. तिथे पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन आम्ही मंदीराकडे निघालो. वाटेत अजून एक दरवाजा लागतो. या दरवाज्यावर गजशिल्पे कोरलेली आहेत. एक देवनागरीतला शिलालेखही आहे. असाच एक शिलालेख  पाण्याच्या टाकीजवळ देखिल आहे. दरवाजातून आत आल्यावर डोलकाठीची जागा आहे. शेजारीच एका मोठ्ठा अर्धगोलाकृती चिलखती बुरूज आहे. इथून डावीकडे जाणारी वाट मंदीराकडे जाते.
मंदीराकडे जाताना बरंच अलिकडे एकदम गलका ऐकू आला. थोडं पुढे जाताच कळलं की जवळपासच्या कोण्या गावातील दहा पंधरा जणांचं एक टोळकं मंदीराच्या ओसरीवर आश्रयाला होतं. गडाचा किल्लेदार संध्याकाळीच मंदीरास टाळं लावून खाली गावात मुक्कामास गेला होता आणि आमच्या मुक्कामाचा बाका प्रश्न समोर उभा ठाकला. त्या टोळक्यातल्या आपापसातील संभाषणातील शिव्या आणि संदर्भ ऐकून त्यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही हे लक्षात आलं होतं. आता किल्ल्यावर मुक्कामासाठी निवारा म्हणावं अशा दोनच जागा होत्या त्या म्हणजे रोहीड्याचे चिलखती बुरूज.त्यापैकी एका बुरुजावर वरच्या बाजूला जागा अत्यंत मोजकी जागा होती आणि झोपेत कोणी उठला तर कपाळमोक्षाची भीती ! म्हणून दरवाजातून आत शिरल्यावर उजव्या हाताला जो अर्धवर्तुळाकार बुरूज आहे त्या दिशेने परत फिरलो. तिथे रात्र काढणं हे पहिल्या पर्यायापेक्षा कमी जोखमीचं होतं. भीती होती ती फक्त सरपटणार्‍या मित्रांची.
बुरूजावर पोहोचताच जनतेला सोबत बांधून आणलेल्या अर्ध्या मॅक्डोनाल्डची आठवण झाली आणि गोल करून मंडळी बर्गर, फ्रेंच फ्राईज, पनीर रॅप, मॅकपफ आणि काय काय उघडून त्यावर तुटून पडली. प्रशांतने तर उच्छाद मांडला होता. काही मंडळींच्या मॅकपफ वर त्याचा डोळा होता.
यथेच्छ हादडून सगळे निवांत झाले आणि गप्पांचा फड रंगला. गारवा हळुहळू वाढत चालला होता. तसा एक एक जण हळुहळू पांघरूणात गुडूप होत होता. पहाटे चारच्या आसपास माझाही डोळा लागला. विजया तर रात्रभर जागीच होती. दोनच तासात फटफटलं आणि सगळे हळुहळू आळोखे पिळोखे देत जागते झाले. उठल्या उठल्या फोटो सेशनला सुरूवात झाली. आम्ही गडफेरीला सुरूवात केली. उन्हं चढायच्या आधी गड उतरणं क्रमप्राप्त होतं. ते कालचं टोळकं अजूनही पेंगतच होतं. पानाफुलांच्या काही निवडक छटा कॅमेर्‍यात बंदीस्त करून आम्ही रोहीड्यावरून पायऊतार झालो.
थंडीची सुरवात तर मस्त झाली होती. आता वेध लागले होते पुढच्या भटकंतीचे !!
काही छायाचित्रे :