९ ऑक्टो, २०१२

सह्याद्रीच्या घाटवाटा - मढे घाट

सह्याद्री डोंगररांगांच्या पूर्वेला दख्खनचं पठार आणि पश्चिमेस कोकण ! या कोकणातून वर देशावर  येण्यासाठी पुरातन काळापासून अनेक घाटवाटांचा वापर केला जात असे. सह्याद्रीतल्या याच घाटवाटांची माहिती, त्यांचं भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्व आपण या लेखमालिकेत पाहणार आहोत. सुरुवात करूया मढे घाटापासून. या घाटाचे नाव मढे घाट पडण्यास तसे कारणही आहे. कोंढाण्यावर म्हणजे आत्ताच्या सिंहगडावर उदयभानाच्या मोगल सैन्याबरोबर झालेल्या तुंबळ लढाईत शिवबांच्या स्वराज्याचा एक महत्त्वाचा शिलेदार तानाजी मालूसरे धारातीर्थी पडला. मराठ्यांनी गड जिंकला; पण तानाजीला या लढाईत वीरमरण आले. या तानाजी मालुसरेंचं मूळ गाव तळकोकणातील पोलादपूरनजिकचं उमरठ. त्यांचं पार्थिव कोंढाण्याहून कोकणात नेताना केळद गावाजवळील या घाटरस्त्याचा वापर केला गेला. तेव्हापासून या घाटाला मढे घाट म्हणून ओळखलं जातं.
 केळद गावातून मढे घाटाकडे जाणारी वाट
पुण्यापासून अदमासे ७० किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरच्या केळद गावाजवळ हा घाट आहे. मढेघाटात जाण्यासाठी पुण्याहून दोन मार्ग आहेत. एक पुणे-सातारा रस्त्यावरील नसरापूर फाट्याहून उजवीकडे वळून वेल्ह्याला जाणारा आणि दुसरा खडकवासला धरणामागच्या खानापूरहून डाव्या हाताला पाबे गावाकडून वेल्ह्याला येणारा. दोन्ही रस्ते पाबे गावाजवळ एकत्र होऊन वेल्ह्यात येतात. वेल्ह्याच्या बाजारपेठेतून डाव्या हाताचा रस्ता आपल्याला केळद गावाकडे घेऊन जातो. वाटेत कानंदीचं खोरं, भट्टी, पासली ही गावं सोडून आपण केळदला येऊन पोहोचतो. केळद गाव पूर्वी अन्नछत्र नावाने ओळखले जायचे. त्याकाळी घाट चढून येणार्‍या पांथस्थांची क्षुधाशांती करण्यास येथे अन्नछत्र चालायचे. केळद गावातून दीड-दोन किलोमीटर पायपीट केल्यावर आपण मढे घाटाच्या तोंडाजवळ येतो.

 घाटमाथ्याहून दिसणारं तळकोकण
घाटमाथ्यावरून खाली तळकोकणातील लहानलहान कौलारू घरांचे पुंजके लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यात मढेघाटाच्या कड्यावरून एक अजस्त्र जलप्रपात कोसळत असतो. हिरवाईने नटलेला घाट पावसाळ्यात अधिकाधिक नयनरम्य होत जातो. इथेच एका खळाळणार्‍या ओढ्यातूनच घाटात उतरणारी वाट आहे.
 घाटात कोसळणारा धबधबा

गर्द वनराईतून जाण्यार्‍या या वाटेवर काही दगडी पायर्‍या प्राचीनतेची साक्ष पटवत राहतात. पुढे ही घाटवाट मधल्या टप्प्यातल्या एका छोटेखानी पठारावर उतरते. या पठारावर डाव्या बाजूला २-३ किलोमीटरवर कर्णावडी नावाची एक छोटी वाडी आहे. या गावात चौथीपर्यंत शाळादेखील आहे.

कर्णावडीतील शाळा
धुकाटात हरवलेली कर्णावडी

पूर्वी या वाडीवर येण्यासाठी फक्त पायवाटाच होत्या. एक केळदहून मढ्या किंवा उपांढ्या घाटातून आणि दुसरी खाली तळकोकणातील रानवडी गावातून. पण अलीकडेच रानवडीहून कर्णावडीपर्यंत कच्चा रस्ता झाला आहे. या कर्णावडीतील मुले माध्यमिक शिक्षणासाठी खाली रानवडीतील शाळेत पायी जातात. कर्णावडीत मुक्काम करायचा झाल्यास तिथली शाळा हा एक उत्तम पर्याय आहे. काही भटकी मंडळी मढ्या-उपांढ्या किंवा मढ्या-शिवथरघळ-कावळ्या किल्ला अशा भटकंत्या करतात. निश्चितच मढे घाट सर्वच ऋतुंमधे सह्याद्रीतल्या निखळ भटकंतीचा आनंद देऊन जातो.

४ जुलै, २०१२

किल्ले भोरगिरी - परसबाग उपक्रमाची पहिली पायरी

किल्ले भोरगिरी - परसबाग उपक्रमाची पहिली पायरी

आधी परसबाग उपक्रमाविषयी थोडं सांगतो. गेल्या १६ वर्षांतील माझ्या भटकंतीत अगणित वेळा किल्ल्यांच्या गावांत, घाटमाथ्यावरच्या, तळकोकणातल्या वाड्यां-वस्त्यांवर, धनगरपाड्यावर तर कधी कोण्या ठाकरवाडीत मुक्काम ठोकले आहेत. त्यांच्या घरी अनेकदा त्यांच्या मांडीला मांडी लावून यथेच्छ जेवलो आहे. या सगळ्यात माझ्या एक गोष्ट ध्यानी आली, ती म्हणजे यांच्या जेवणात मुख्यत्वे भात, तांदळाची किंवा नाचणीची भाकरी आणि भाकरीबरोबर खायला फक्त ठेचा किंवा खरडा आणि डाळ किंवा पिठलं. आहारात हिरव्या भाज्यांचा लक्षणीय अभाव ! मग या अभावाची प्रमुख कारणं शोधली. बाजारपेठ लांब असल्यामुळे ताज्या भाज्या फक्त आठवड्याच्या बाजारालाच मिळंत. त्या विकत घेण्यासाठी लागणारे पैसे बर्‍याचदा अनेक कुटुंबांकडे नसतात, आणि भाजी विकत आणली जरी तरी ती आठ दिवस टिकत नाही. यावर काहीतरी उपाय-योजना करावी अशी खूप दिवसापासून इच्छा होती. परसबागेविषयी कुठेतरी वाचण्यात आलं होतं. स्वता:च भाज्या पिकवाव्यात आणि आपल्या आहारात त्यांचा वापर करावा ही संकल्पना, माझ्या समस्येवर थोडीतरी प्रभावी ठरेल असे वाटले आणि विचारांची चक्र या परसबाग उपक्रमापाशी येऊन थांबली. भटकंतीनिमित्त मी अनेक दुर्गम वाड्या-वस्त्यांवर फिरत असतोच तर मग त्याच वेळी तिथे पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या बिया वाटायच्या, लोकांना परसबागेचे महत्व आणि माहिती पुरवायची हे नक्की केलं. पावसाळ्यात या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवायची ठरवलं. माझे काका श्री. श्रीकांत सातारकर हे शासनाच्या कृषी खात्याच्या बी-बियाणे विभागात अधिकारी आहेत. त्यांच्याशी संपर्क करून काही मदत मिळू शकेल का ? याबद्दल बोलणी केली. त्यांना या उपक्रमाबद्दल सविस्तर माहीती दिली. त्यांनीही संपूर्ण सहकार्य देण्याची तयारी दर्शविली. जूनच्या तिसर्‍या आठवड्यात काकांनी माझ्या हाती भेंडी, गवार आणि मुळा या भाज्यांच्या बिया ठेवल्या देखिल ! उपक्रमाला आकार येऊ लागला होता आणि त्याची सुरूवात भोरगिरीच्या वाडीवरून करायची असे ठरविले. झालं ३० जून आणि १ जुलैला भोरगिरी ट्रेक ठरला !

 भोरगिरी गावातून दिसणारा किल्ला
भोरगिरी राजगुरूनगर तालुक्यातलं शेवटचं गाव. गाव म्हणण्यापेक्षा वस्ती म्हणूयात. १५-२० घरांच्या दोन वाड्या आहेत. शनिवारी दुपारी आम्हा नऊ भटक्यांची टोळी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर भोरगिरीच्या दिशेने निघाली. पुणे-नाशिक हायवेवरून राजगुरूनगर साधारण ४५-५० किलोमीटर आहे. इथून एक रस्ता डावीकडे भोरगिरी कडे जातो. भोरगिरी इथून ५६ किलोमीटर आहे. फाट्याहून आत शिरलो तेव्हा दोन वाजले होते. उन्ह-सावलीचा खेळ चालू होता. डाव्या बाजूला चासकमान धरणाचा सुकलेला जलाशय सोबत करीत होता. आमच्यासारखा तोही पावसाच्या भेटीस तहानलेला दिसंत होता. कमान, चास, वाडा ही गावं सोडली आणि फराळासाठी गाड्या एका मोठ्या झाडाखाली लावल्या. बाजूच्याच शेतात बसून बरोबर आणलेला फराळावर ताव मारला. आनंद उर्फ पिंट्या एकादशी आणि दुप्प्ट खाशी .. असलं काहीतरी बरळत होता.  त्याच्याकडे सोईस्कर कानाडोळा करत सगळ्यांनी खिचडी, बटाट्याचा चिवडा, राजगिरा रोलचा फन्ना उडवला. भोरगिरी गावात पोहोचलो तेव्हा चार वाजले होते. गावाबाहेरच्या कोटेश्वराच्या मंदिरापाशी गाड्या लावल्या.

मंदीराशेजारील घाट

  भीमा नदीचे डोह

 भीमा नदीचे डोह
भीमा नदीच्या काठावरचं हे शंभूमहादेवाचं मंदिर आणि घाट साधारण नवव्या शतकातले असल्याचे उल्लेख सापडतात. गडावरच्या गुहा आणि बांधकाम देखिल याच काळातलं. मंदीराच्या प्रांगणात मोठ्ठा पार आहे आणि आसपास बरीच भग्न शिल्प विखुरली आहेत. भोरगिरी किल्ल्याचं एक नाव भंवरगिरी असंही आहे. किल्याच्या नावावरूनच गावाचं नाव भोरगिरी असे पडले.

 मंदीराच्या प्रांगणातील शिल्पे
 मंदीराच्या प्रांगणातील शिल्पे
  मंदीराच्या प्रांगणातील शिल्पे
  मंदीराच्या प्रांगणातील शिल्पे

नदीला चांगलं चार-पाच फुट पाणी होतं. पाणी बघताच शितल श्रीकांतला एकदम चेव आला. आत्ताच पाण्यात जायचं म्हणून शितल हटून बसली. गडावरून आल्यावर निदान एक तास तरी डुंबायचं या आश्वासनावर तिने आपला हट्ट मागे घेतला आणि आम्ही गडाची वाट धरली. भोरगिरी समुद्रसपाटीपासून साधारण ८५० मीटर उठावला आहे. पण गावातून त्याची उंची १५० मीटरच्या आसपास असेल. गावातून ३० मिनिटात गडमाथा गाठता येतो. गावातून सावित्राबाई नावाच्या मावशीही आमच्यासोबत गडावर यायला निघाल्या. या सावित्राबाई गेली कित्येक वर्षे न चुकता गडावरील महादेवाची आणि महालक्ष्मीची सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती आणि पूजा करत आहेत. वाटेतल्या ओढ्यावर फेब्रुवारी महिन्यात शासनाने बांधलेला बंधारा आडवा आला.
 वार्‍यावर तरारणारी भाताची रोपं
 वाटेवर लागणारा छोटेखानी धबधबा
तो पार करून गडाच्या वाटेला लागलो थोडं वर जाताच एक वाट सरळ गडावरल्या गुहेकडे जाते आणि एक वाट उजवीकडून गडाला वळसा घालून माथ्यावर जाते. हिलाच पुढे जाऊन गुहेकडून येणारी वाट येऊन मिळते. गुहेकडे जाण्यार्‍या वाटेवर सोप्या श्रेणीतील प्रस्तरारोहण करून १५ मिनिटात गुहेत पावते झालो. इथे ४०-५० लोकांची झोपण्याची सोय होऊ शकते. आतल्या गाभार्‍यात एक पुरातन शिवलिंग आहे त्यावर लहान लहान १२ पिंड आहेत. ही बारा पिंड बारा ज्योतिर्लिंगांचे प्रतिक आहेत अशी माहीती सावित्राबाईंकडून मिळाली. गुहेपासून उजव्या हाताला गेल्यावर महालक्ष्मीची बारामाही पाण्यात असणारी गुहा आहे.
 गडावरून दिसणारं भोरगिरी गाव
 गुहेतला नंदी अन् गाभारा
 बारा पिंड असलेलं शिवलिंग
 क्षणभर विश्रांती
 बारामाही पाण्यात असलेली महालक्ष्मी गुहा
शेजारीच पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत. त्यातील थंडगार आणि मधुर पाणी वर्षभर आपल्या सारख्या भटक्यांची तहान भागवते. गुहेवरून वाट थोडी खाली जाऊन गडमाथ्याकडे जाण्यार्‍या मुख्य वाटेला येऊन मिळते. गडाचे दरावाजे होते यावर विश्वास बसणार नाही इतकी पडझड झाली आहे. नावालाच शोभाव्या अशा तटबंदीच्या काही खुणा आढळतात. वर पोहोचल्यावर समोरच गुहासदृश कोठ्या आहेत.
 भिमाशंकर अभयारण्य
 कोठ्या
 गडमाथ्याकडे जाणारी वाट
कोठ्यांकडून उजव्या हाताला गेल्यावर झाडीमधे एक-दोन शंकराच्या पिंडी आणि काही दगडी अवशेष आहेत. इथून माथ्याकडे गेल्यावर काही पडकी जोती दिसतात. गडफेरी करताना दगडात खोदलेली ४-५ खांब टाकी नजरेस पडतात. इतक्या छोटेखानी गडावर इतक्या जास्त प्रमाणात टाकी का असावीत असा प्रश्न पडला, पण त्या टाक्यांची जागा लक्षात घेता तटबंदी बांधण्याकरता लागणारा दगड या टाक्यांतूनच काढला असणार हे ध्यानात आलं. थोडेफार फोटो काढून गड सोडला.



 डावीकडून आदर्श, श्रीकांत, शितल, शुभम, आनंद उर्फ पिंट्या, पल्लवी, अनिकेत आणि नितीन
 चला विसावू या कड्यावर
 पाण्याची टाकी

 नागफणी
 गो ग्रीन !
वाटेत येताना जनता करवंदांच्या जाळ्यात अडकली आणि मग चिकट हात आणि रंगलेली तोंड घेऊन सगळी मंदीरात परतलो. सगळ्यात आधी मी पाण्यात सटकलो. एकटाच होतो. त्या शांत मळभ भरल्या आसमंताखाली भीमेच्या डोहातल्या नितळ पाण्यावर तरंगताना जे काही अनुभवलं, जे काही मनी दाटलं ते शब्दांत मांडणं कठीण ! तंद्रीच लागली होती माझी. थोड्याच वेळात शितल, श्रीकांत, पल्लवी, अनिकेत, नितीन आणि आदर्श पाण्यात शिरले आणि दंगा सुरू झाला. तासभर यथेच्छ डुंबून झाल्यावर बाहेर निघालो. उपवास असल्याने वरईच्या तांदळाच्या खिचडीचा बेत आखला होता. तयारीला लागलो. कोणी वरई धुवून आणली, कोणी बटाटे चिरले, कोण कोथिंबीर निवडत होतं. मी स्टोव्ह पेटवून फोडणी दिली आणि वरई शिजू लागली. पिंट्याच्या पोटातल्या कावळ्यांची आता गिधाडं होऊ लागली होती त्यामुळे त्याच्या पोटलीतून बर्‍याच प्रकारचे वेफर्स आणि तत्सम जिन्नस बाहेर पडले. खिचडी मस्त झाली होती हे, ती खाताना सगळ्यांनी पाळलेल्या सामूहिक मौनावरूनच कळत होते. मी मनातल्या मनात स्वता:ची पाठ थोपटून घेतली. रात्री उनो खेळणे, मोठ्या आवाजात गाणी म्हणणे, कोणालातरी यथेच्छ चिडवणे असले प्रकार करत झोपायला दोन वाजले.
 निरागस
 निरागस
  सावित्राबाई आणि त्यांचं गोंडस पिल्लू
सकाळी लवकर उठून सगळे तयार झाले. कारणही तसेच होते. विकीमॅपियावर पाहिलेला एक धबधबा शोधायला आम्ही भिमाशंकरच्या अभयारण्यात शिरणार होतो. सावित्राबाईंकडुन जुजबी माहीती मिळाली. त्या दिशेने आमचा मोर्चा वळवला. वाटेत बरेच लहान मोठे धबधबे आडवे आले. एकदोन ठिकाणी सोप्या श्रेणीचे कातळारोहण करून जंगलात अजून आत शिरलो.
धबधबा
 धबधबा
 धबधबा
 धबधबा
जंगली श्वापदांच्या अधिवासात आपण आलो आहोत हे दर्शविणार्‍या अनेक खूणा नजरेस येत होत्या. कधी एखाद्या वन्य प्राण्यांची विष्ठा, कधी रानडुकरांनी उकरलेली जमीन एक ना दोन. एकदम मी थबकलो, एका झाडाच्या बुंध्यावर नख्यांनी ओरखडल्याच्या खुणा होत्या. त्यातल्या काही जमीनीपासून तीन फुटांवर तर काही पाच फुटांवर होत्या. त्यातल्या एक तर नक्कीच बिबट्याच्या होत्या. दुसर्‍यांचा अंदाज नाही आला. थोड्या अस्पष्ट होत्या. क्षणात एक थंडगार लहर अंगभर पसरली. पण आम्ही ९ जणं होतो त्यामुळे फारसा धोका नव्हता. तसेच पुढे निघालो.
 नखांनी ओरखडलेल्या खुणा
 धबधबा
 थोड्याच वेळात आम्ही ज्याच्या शोधात होतो, तो दिड-दोनशे फुटावरून टप्याटप्प्यांत कोसणारा धबधबा सामोरा आला. एक समाधानात्मक विजयी मुद्रा चेहर्‍यावर पसरली आणि आम्ही सगळेच देहभान विसरून त्या धबधब्यामुळे तयार झालेल्या डोहात उतरलो.
 धबधबा
श्रीकांत आणि पिंट्या
 मस्ती.कॉम
 धबधबा
धबधबा
चांगले दोन-तीन तास त्या थंडगार पाण्यात मस्ती करून परतीच्या मार्गावर निघालो. येताना आलेल्या वाटेला पर्यायी वाट शोधायला मी थोडा पुढे गेलो. तिथूनच एक ढोरवाट पकडून गावात पोहोचते झालो.

सावित्राबाईंना वाडीतल्या सगळ्या कुटुंबातल्या महिलांना एकत्र करण्यास सांगून मी बीयाणं आणायला गाडीकडे गेलो. आधी तर लोकांना वाटले की भाज्यांच्या बिया विकणारेच लोक आले आहेत. म्हणून त्यांनी या सभेला नापसंती दर्शविली. मग सावित्रांबाईंनी त्यांना सांगितले की हे लोक उपक्रमवाले आहेत. ते कोणत्याही प्रकारचे पैसे घेणार नसून आपल्याला भाजीपाल्यासाठी बियाणं वाटायला आले आहेत. तेव्हा कुठे ताया-माया जरा पुढे सरायला लागल्या. मग मी सगळ्यांना परसबाग उपक्रमासंबंधीत माहीती दिली. सोबत आणलेल्या बियांणांची आणि त्या कशा लावयच्या याची माहीती दिली. वाडीतल्या १५ कुटुंबांना बियाणं देऊन त्यांची नावं आणि असतील तेव्हढे दूरध्वनी क्रमांक यांची डायरीत नोंद केली. एक महिन्यानंतर परत भोरगिरीला जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घ्यायचं ठरवलं. मधल्या काळात सावित्राबाई मला जमेल तेव्हढी माहिती फोनवरून कळवणार होत्या. त्या सगळ्या गावकर्‍यांच्या चेहर्‍यावर आम्हाविषयी कौतुकाचे भाव दिसत होते. यातच सगळं आलं होतं. उपक्रमाचं पहिलं पाऊल तर सुरळीत पडलं होतं. अजून बरीच मोठी वाटचाल होणे आहे !
येताना वाड्यातल्या हाटीलात मिसळ हाणताना सगळ्यांच एकच म्हणणं पडलं ! यंदाच्या पावसाळ्यात भोरगिरीला किमान अजून दोनदा तरी यायचंच !!
--
अमोल नाईक  (जातीवंत भटका)

२० जून, २०१२

चंदन-वंदन - पावसाची पहिली भेट

जूनचं पहिलं दोन आठवडं गेलं तरीबी  पावसाचा तप्पास नव्हता. कोल्हापूरात कवा धरनं घुटमळत्योय पन पुन्याकडं सरायचं काही नाव नाय पठ्ठ्याचं. त्यो इतका रग्गेलपना दावतोय तर म्या म्हनलं, या बारीला आपणच जावं सातार्‍या पतुर ! चंदन - वंदन वर जाऊन लई दिस झालं होतं तवा या बारीला त्यांना भेटायचं नक्की क्येलं. पावसाचीबी गाठ पडायला म्हनलं तेव्हडचं निमित.

 बेलमाची गावातून दिसणारा चंदन किल्ला
चंदन-वंदन मधलं बेचकं
पायथ्याचं मंदीर, मागे वंदन गडाचा पसारा
दुपारला अडीचला पुनं सोडलं आन् गाड्या भुईंज कडं हाकल्या. आवंदाच्या टायमाला आमच्या मंडळी त्यांच्या धाकल्या बहीनीसंगट आल्या व्हत्या. आप्पांच्या गावचा म्हंजी तळेगावच्या जोश्यांचा हृषीकेश होता, श्रीकांत त्याच्या कुटुंबाला घेऊन हाजीर व्हता आनी पुन्यातूनच वृंदा आनी मैत्रयीनी वर्दी दिली व्हती. शिवापूरला च्या पिऊन घेतला आन गाड्यातनी तेलं भरून घेतली. पुढला च्या वाई फाट्यावर घ्येतला. भुईंज मधून गाड्या डाव्या अंगाला बेलमाची गावाकडं जानार्‍या वाटंवर घातल्या न घातल्या तोच पावसाची बारीक सर आली. पठ्ठ्या अखेरीस भेटलाच तर ! गाड्या  वरच्या बेलमाचीत लावल्या अन् सरल खिंडीकडं निगालो. समदी मंडळी फोटू काडत काडतच चालली व्हती. 
 फोटू सेशन
मावळतीच्या अंगाला वैराटगड डोस्कं ढगात टाकून बसला व्हतां. कदी मदी त्याच्या टकूर्‍यावर मावळतीचं सोनं दिसत व्हतं. त्याच्या मागल्या बाजूनं महाबळेशराचं पठार. लैच झ्याक नजारा ! तिथंन पावलं काय निघना. मदीच आभालाच्या घोंगडीला भोकसं पडून त्यातनं सुर्व्याची किरनं जिमिनीवर सांडत व्हती. फोटू काढत अन् करंवंद खात खात चंदन-वंदनच्या मधल्या टापावरं पोचलो. 
 वैराटगड अन् आजूबाजूला सांडणारी किरणे
 आभाळाला पडलेली ठिगळं
  आभाळाला पडलेली ठिगळं
 मावळतीच्या सोनसळी रंगात न्हाऊन निघालेलं बेलमाची
 वैराटगडावर पसरलेलं मावळतीचं सोनं
वंदनची वाट तर लगेच घावली. चंदनकडं जानारी वाट गडाच्या भिताडाला वळसा मारून जानारी व्हती. म्या अन् श्रीकांतनं थोडं म्होरल्या अंगाला जाऊन बघितलं, पर लैच घसारा ! म्हागारी फिरलो. अंधारायला झालं व्हतं तवा बिगी बिगी पावलं उचलीत वंदन गडावरला दर्गा गाठला. भणाभणा वार्‍याचं फटकं बसत व्हतं अन् पाऊस उगा गोमुत्र शिंपडल्यावानी पडंत व्हतां. 
 चंदनच्या डोक्यावर चाललेला ढगांचा खेळ
 मपलं बारदान अन् मागं चंदनचा कडा
 वंदनचा बुरूज
 अखिल डोंगरयात्रा महिला मंडळ - एका मावळत्या क्षणी
 चंदन जवळच्या टापावरून दिसणारा वंदनचा पसारा
 श्रीकांत एका निवांत क्षणी (फोटो : हृषीकेश जोशी )
 चंदनची वाट शोधाताना मी आणि श्रीकांत
दर्ग्याच्या अंगनात, घरनं बांधून आनलेलं जेवान सोडलं आनिक समदी खान्यावर तुटून पडली. कवाधरनं पोटात कावळं वरडत व्हते. समदं संपवून नवाच्या काट्याला सगळी दर्ग्यात पार आडवी ! मंग आमच्या मंडळींच्या आर्जवावर गान्याच्या भेंड्या सुरू झाल्या. दोन तीन घंटे गळे फाटूस्तवर आम्ही आरडत व्हतो. पावसाचा शिडकावा अन् भनाननारा गार वारा ! थंडी लागली नाय तर नवल ! सगळी मंडळी गप गुमान पडली.
 वृंदाने काढलेला हादडीचा फोटो
पहाटं पाचच्या टायमाला म्या सुमडीत दर्ग्यासमोरल्या तळ्याकडं बसून आलो. लईच काकडं भरलं व्हतं. सातला मंडळी उठली अन् धुकाटातच मागल्या कड्यावरं जमली. ढगांची लै दाटी झाली व्हती. उगवतीला चंदनच्या अंगाखाद्यावरून मधल्या खिंडीत येत ढगांच्या आंघुळी चालल्या व्हत्या. दोन चार पवनचक्क्या पल्याडल्या टापावरून आपल्या माना वर काढून हा सारा खेळ न्याहाळीत व्हत्या. ढगांवर मधिच सूर्व्याची किरणं पडून चमकित व्हती. सकाळ्च्या पारी लैच झ्याक दिसत व्हतं सारं. फोटू काढून सामानाची बारदानं बांधली. 
 ढगांचा खेळ
 ढगांमधून माना वर काढून पहाणार्‍या पवनचक्क्या
 :)
  ढगांमधून माना वर काढून पहाणार्‍या पवनचक्क्या
 चंदन-वंदनच्या मधल्या बेचक्यात तयार होणारे ढग
  ढगांमधून माना वर काढून पहाणार्‍या पवनचक्क्या
 धुकाटात हरवलेला वंदनचा बुरूज
गडावर प्यायच्या पान्याचा ठनठनाट व्हता तवा च्या खाली गावातच घेनार व्हतो. बारदानं पाठीला मारून गडावरच्या धुकाटात शिरलो. अजून एक भली थोरली दर्ग्यागतच इमारत पाहिली. एक तीन दरवाज्याचं बैठ कोठारबी हाय. पर दरवाजात लैच गचपण माजलं व्हतं. एका दरवाजातून आत डोकावलो तर वाघळाच्या मुताच्या वासाची घान उठली होती. तसाच मागं फिरलो एक दोन फोटू काढलं आन परतीच्या वाटेवर निघालो. वाटेत अजून एक दोन तळी लागली. अन् पडक्या वाड्यांची जोती बी दिसली. महाराजांच्या काळात गडावं मोप राबता असनार. दरवाजाकडं दगडी जिनं उतरतं झालो. वरच्या दरवाज्यावर एक फारसी भासेतला शिलालेख घावला. आतमदी पहारेकर्‍याच्या देवड्याबी हायेत. त्यामधूनच वरच्या बुरजावर जायला भिताडातून एक बोळकांडं आहे. त्याच्याबी तोंडावर लैच गचपण. खालच्या ढासळलेल्या तटबंदीतून दरवाज्याकडं गेलो. या दरवाज्यावर मात्र गणेशाची मूर्ती अन् कमळं कोरली व्हती. फोटू काढलं अन बेलमाचीची वाट धरली.
 रानभुली
 दर्ग्यासमोरच्या तळ्याकडे जाणारी कमान

 रानभुली
 अजून एक दर्गा
 रानमेवा-डोंगरची मैना
 कोठारं
 रानभुली
 दगडी पायर्‍या
 पहारेकर्‍यांच्या देवड्या
 दरवाजा
 फारसी शिलालेख
 दरवाज्याची कमान
 दरवाज्याजवळच्या बुरूजावरील गणेश मुर्ती आणि कमळ

 डोंगरयात्राचे शिलेदार
माझ्या जिवाभावाच्या मैतराशी भेट झाली अन् जीवाला कशी शांतता लाभली व्हती. आम्हास्नी सोडाया पार पुन्यापत्तुर साथ केली पावसानं. पावसाची सुरूवात तर लैच झ्याक झाली हाय. आता म्होरल्या भटकंतीचे बेत आखाया आम्ही मोकळं !