१७ नोव्हें, २०१४

सह्याद्रीतील ग्रँड कॅनियन - सांदण दरी



रतनगड-सांदण दरी असा बेत ठरला आणि म्हणता म्हणता आठ भिडू जमा झाले. शुक्रवारी रात्री साडेदहाला आम्ही नाशिक फाटा सोडला. मुंबईहून अभिजीत पहाटेच्या कसारा लोकलने निघून सकाळी लवकर शेंडी गावात भेटणार होता. पहाटे साडेतीनला आम्ही शेंडीतल्या दत्तमंदिरात आमच्या पथार्‍या पसरल्या. मंदिरात येणार्‍या भक्तांच्या घंटानादाने सगळी लवकरच जागी झाली. चहा नाष्टा उरकतोय तो अभिजीत लालडब्यातून उतरला.




आज सांदणदरी पाहून रतनगडावर मुक्कामाचा बेत होता. हे आपल्याला कितीही सोपं वाटत असलं तरी त्यासारखं घडत नाही याचा अनुभव पुढे आलाच.
भंडारदर्‍याहून साम्रदकडे जाताना अलंग-कुलंग-मदन हे अनोखे दुर्गत्रिकूट सोबत करीत होते. घड्याळाचा काटा साडेनऊ दाखवत होता पण, ऊन्हाच्या काट्याने बाराचा आकडा कधीच ओलांडला होता. ट्रेकच्या नियमाप्रमाणे मधे एकदा वाट चुकायचा कार्यक्रमही झाला. घाटघर आश्रमशाळेच्या फाट्याने आम्हाला फाट्यावर मारले होते. १०.३० वाजता साम्रद गावात पोहोचलो. मी नेहमीच्या गोपाळमामांकडे दुपारच्या जेवणाची व्यवस्था लावायला सटकलो. वाडीमागच्या पठारावरून एक वाट सांदणच्या मुखाकडे जाते. त्या वाटेवर आलो तेव्हा अकरा वाजले होते. सूर्व्या चांगलाच आग ओकत होता. सांदणच्या अरुंद मुखाशी बरी झाडी टिकून आहे.
सांदण सामोरी आली. सांदण ! सह्याद्रीतील एक अजब नवल ! अतिशय विलक्षण आणि एकमेवाद्वितीय भौगोलिक रचना ! इंग्रजीत Geographic Fault Line तर मराठीत भौगोलिक प्रस्तरभंग रेषा अशी याची शास्त्रीय नावे. जमिनीच्या पोटात तीन-चारशे फूट खोलीची आणि सुमारे दीड किलोमीटर लांबीची ही घळई निसर्गाचा अद्भूत असा चमत्कारच आहे. त्याची प्रचिती ही तिथे गेल्याशिवाय यायची नाही.
पावसाळ्यात  घळईतून पाण्याचे अतिशय वेगवान लोंढे कोकणात उतरत असतात त्यामुळे आत जाणे शक्य नसते. हिवाळा संपता पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत आपण घळईच्या टोकाशी जाऊ शकतो.
गर्द झाडोर्‍यातून मुख्यवाटेपासून उजवीकडे आपण घळईत उतरू लागतो. घळईच्या तोंडाशीच बारामाही टिकणारा पाण्याचा झरा आहे. बाजूलाच एक जनावरांसाठीचा पाणवठा आहे. मी तर त्या झर्‍यावर अक्षरशा: आडवाच पडलो. पाण्याची चव अफलातून होती. त्या झर्‍याचे थंडगार अमृत यथेच्छ पिऊन झाल्यावर आम्ही दरीत उतरू लागलो. सुरुवातीलाच एक अजस्र धोंडा आडवा येतो. त्याच्या उजव्या अंगाने निमुळती वाट खाली उतरते.




दरीतील थंडावा वरील पठारावरच्या तापमानात चार ते पाच अंशाची घट झाल्याची पावती देतो . संपूर्ण दरी लहान मोठ्या धोंड्यांनी भरलेली आहे. घळईची रुंदी कधी पाच फूट तर कधी पंधरा फूट ! पुढे जाताना दोन ठिकाणी वाट पाण्यातून पार करावी लागते. पहिल्या जागी पाणी गुडघाभर तर पुढल्या टप्प्यात कमरेएवढे पाणी असते. हिवाळ्याच्या सुरवातीला तर पाण्याचा स्तर छातीपर्यंत असतो. हे पाणी भलतेच थंड असते. पायाला मुंग्या लागण्या इतपत थंड !
वाटेत एका बेचक्यात एक जखमी वाघूळ टकामका आमच्याकडे पहात पडून होते.





त्या निसर्गनवलाचे कितीही फोटो काढले तरी कमीच वाटत होते. घळई तिच्या टोकापाशी थोडी रूंद होते आणि दगडधोंड्यांचा आकारही वाढतो. तिथे अस्ताव्यस्त पसरलेल्या या दगडधोंड्यांवरूनच पावसाळ्यात होणार्‍या घळईच्या अक्राळ-विक्राळ रूपाची कल्पना येऊ शकते. दरीच्या टोकावरून खाली कोकणात उतरणारी एक अवघड वाट आहे. ती पुढे जाऊन करवली घाटाच्या वाटेला जाऊन मिळते. पण या वाटेने उतरण्यासाठी प्रस्तरारोहणाची आणि त्यासाठी लागणार्‍या साहित्याची आवश्यकता आहे. अनावश्यक धाडस टा़ळावे. परत जाताना पाय निघण्यास तयार नव्हते. तसेच पाय ओढत त्या भारलेल्या दरीतून आम्ही साम्रद गाठले तेव्हा तीन वाजले होते. गोपाळमामांनी जेवणाची ताटं लावायला घेतली. वांगंबटाटा रस्सा, भाकरी, भात, आमटी आणि झणझणीत ठेचा असा फक्कड बेत जमून आला होता. जेवताना गोपाळमामांशी झालेल्या गप्पांत कळले की गावची जत्रा असल्याने रतनगडावर तळीरामांची गर्दी असणार आहे. येथे आमच्या रतनगडावर  मुक्कामाच्या बेताला पहिला सुरूंग लागला. त्यात प्राजक्ताचा पायही दुखावला होता.
रतनगडाला पर्याय म्हणून जवळच्याच कोकणकड्याला भेट देण्याचं ठरवलं आणि गाड्या घाटघरच्या धरणाकडे दामटल्या.घाटघरच्या बंधार्‍यात यथेच्छ डुंबून झाल्यावर सूर्यास्ताचा नजारा पहाण्यासाठी कोकणकड्यावर गेलो. डाव्या-उजव्या बाजूला सणसणीत उंचीचे कडे, त्यांच्या तळात विसावलेल्या कोकणातल्या वाड्या, करवली घाटाची वाट आणि या सगळ्यांवर आपली लाल केशरी माया उधळणारा सूर्यनारायण. केवळ अद्भूत !





अजून एक रम्य संध्याकाळ आठवणींच्या खात्यात जमा करून साम्रदमधे परतलो. अंधार आणि थंडी सोबतच वाढत होते. येताना सहज नजर वर गेली आणि आकाशात पसरलेला चांदणचुरा डोळ्यात भरला. ठरलं! आजची रात्र उघड्यावर झोपायचं, जिथे हे नक्षत्रांचं दालन पहाटेपर्यंत कधीही डोळे उघडले तरी पाहता येऊ शकेल. गावापासून जवळंच एका शेताडीत गाड्या काटकोनात लावल्या आणि मध्यभागी झोपण्यासाठी जागा साफ करून घेतली. एका बांधाच्या आडोश्याला चूल पेटवली आणि खिचडी रटरटू लागली.आम्ही सगळेच तार्‍यांच्या रंगपटात हरवलेली नक्षत्रे शोधत बसलो होतो. थंडीने कुडकुड वाढवल्यावर सगळे आपापल्या स्लीपिंग बॅगमध्ये शिरले. 
सकाळी लवकर उठून आम्ही रतनवाडीकडे निघालो. रतनवाडीत असणारे अमृतेश्वराचे मंदिर म्हणजे हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरावर आणि आतल्या खांबांवर प्रचंड प्रमाणात कोरीवकाम, यक्षकिन्नरांच्या मूर्ती, पुराणातील प्रसंग, समुद्रमंथन आणि इतर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या बाजूलाच एक दगडी पुष्करणी आहे विष्णूतीर्थ नावाची. यात विविध प्रकारच्या मूर्ती आणि कोनाडे आहेत.





सांदण ! एक निसर्गनवल, सह्याद्रीतली एक जरा हटके जागा, जमिनीच्या पोटातली थंडगार वाट, घळीतला ऊन-सावलीचा थरार, हात-पाय गोठवणारी पाण्यातली वाटचाल, ऊन्हाचे कवडसे लेऊन सोनेरी झालेले घळीतले दगड अश्या अनेक आठवणी काखोटीला मारून रतनवाडी सोडलं खरं, पण लवकरच परत येण्याच्या बोलीवर !