१ फेब्रु, २०१३

कल्याणगड - वर्धनगड - वारूगड
















वारूगड माची आणि बालेकिल्ला

शनिवार रविवार कल्याण-वर्धन-महिमान-वारू-भूषण असा मॅरेथॉन ट्रेक करण्याचं निश्चित केलं आणि एक एक भिडू जमायला सुरुवात झाली. या ट्रेकला आठपेक्षा जास्त लोक नकोत असे ठरवले होते. पण आपण जसे ठरवू तसे होत नाही याची प्रचिती आली आणि पुढे ट्रेकभर ती येतच गेली. तेरा भिडू तयार झाले. शनिवारी पहाटे ५.२० ला अस्मिता आणि विजया (विजी) पत्ता शोधत माझ्या घरी पोहोचल्या. मी गाडीत सामान लोड करत असताना आनंद (पि़ंट्या) त्याचं सफारी नामक धूड घेऊन पोहोचला आणि बाकी मंडळींची वाट पहाण्यात लागणारा वेळ सत्कारणी लावण्यासाठी आम्ही कर्वेनगच्या चौकात चहा मारायला सटकलो. इकडे नितीन, सायली, शुभम (मेंढी), नेहा, शितल आणि श्रीकांत माझ्या घरी पोहोचले होते. साडेसहाला दोन गाड्या सिंहगडरोडला प्राजक्ता आणि केतन(मॅगी) यांना आणायला सटकल्या आणि मी आमची गाडी कात्रजच्या दिशेने हाकली. पौर्णिमा तिथे आमची वाट पहात होती. सातारारोडवर मॅक्डीजवळच्या पंपावर टाक्या फुल्ल करून शिरवळच्या श्रीराम वडापावचा रस्ता धरला. सकाळी-सकाळी पोटातल्या कावळ्यांना वडापावची आहूती देऊन कल्याणगडाकडे निघालो.

 कल्याणगडावरील पार्श्वनाथांची गुहा
कल्याणगडाच्या पायथ्यापर्यंत गाडी जाते. गडाकडे जाण्यासाठी विकीमॅपियावरून एक जवळचा रस्ता शोधला होता. भुईंज-राऊतवाडी-शिवथर-सातारारोड-नांदगिरी. हा रस्ता चंदन-वंदन या दुर्गजोडीला अगदी खेटून जातो. वंदनच्या मागून राऊतवाडीहून रस्ता शिवथर गावाकडे जातो. रस्ता थोडा खराब आहे; पण ३०-३५ किलोमीटरने अंतर कमी होते आणि वेळही वाचतो. सातार्‍याकडून माणदेशाकडे म्हणजे पूर्वेकडे असलेले किल्ले हे सह्याद्रीच्या मुख्य रांगांपासून सुटावलले दिसतात. कल्याणगडही त्याला अपवाद नाही. नांदगिरीहून कल्याणगडावर जाणारा रस्ता प्रचंड खराब आहे. खर्‍या अर्थाने 'ऑफ-रोडींग' करत आम्ही कल्याणगडाच्या दरवा़ज्याजवळ पोहोचलो.
गडाच्या आजूबाजूच्या डोंगरांवर अजस्र पवनचक्क्या उभारल्या आहेत. गडाची बांधणी साधारण अकराव्या शतकातली. गडाच्या पहिल्या उत्तराभिमुख दरवाज्यातून प्रवेशते झालो. समोरच एक पडझड झालेले मंदीर आहे. त्याच्या डाव्याहाताला तटबंदीला लागून थोडं खालच्या बाजूला मुख्य किल्याच्या पोटात एक लांबसडक गुहा आहे. गुहेत बारामाही पाणी असते. डोकी संभाळत खाली वाकून गुहेतील त्या मिट्ट अंधारात चालण्याचा थरार काही औरच होता. गुहेच्या टोकाला पार्श्वनाथांची साधारण नवव्या शतकातील म्हणजे किल्याहून जुनी काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. शेजारी दत्ताची संगमरवरी आणि पद्मावती देवीची दगडी मूर्ती दिसते. गुहेकडे जाणार्‍यावाटेवर मधमाश्यांची मोठी पोळी आहेत. तेव्हा आवश्यक ती खबरदारी घेऊन आम्ही गडाच्या दुसर्‍या पूर्वाभिमुख दरवाजातून गडमाथ्याकडे निघालो.
 पार्श्वनाथांची नवव्या शतकातील मूर्ती
 पद्मावती देवीची मूर्ती
 गुहेच्या डोक्यावरील मधमाशांची पोळी
 समोरंच हनुमानाचे मंदीर आहे. मंदिराशेजारून वाट थोडी वर चढते. वर एका साधूने बळकावलेलं एक खोपटं दिसतं. त्याच्या समोरच कल्याणस्वामींची समाधी आहे. बाजूला कोरडा तलाव. गडावर बरेच सिमेंटचे बांधकाम दिसते. धर्मशाळा, जीर्णोद्धारीत मंदीर, प्रार्थनास्थळं. या सगळ्यात मुळचं किल्लेपण हरवून बसलेल्या कल्याणगडाला राम राम ठोकून आम्ही कोपरगावकडे निघालो. 
 कल्याणगडाचा दरवाजा
 कल्याणगडावरील वीरमारूती
खोपटं
 तलावारीचे चिन्ह कोरलेला दगड
 कल्याणस्वामींची समाधी
पुढला किल्ला वर्धनगड, कोरेगाव आणि पुसेगावच्या मधल्या घाटावर नजर रोखून बसला होता. साडेबारा वाजून गेले होते. आणि पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. कोपरगावच्या बाहेर एका हाटीलात हादडीला थांबलो. जेवणं उरकून बाहेर येतोय तो पिंट्याच्या सफारीचं मागलं चाक पार सपाट ! ऑफ-रोडींग चांगलंच भोवलं होतं. चाक बदललं आणि वर्धनगडाकडे सुटलो.
गाड्या गावात लावून पायर्‍या चढू लागलो. अफजलखानाच्या वधानंतर महाराजांनी हा किल्ला बांधला असे म्हणतात. कदाचित अफझुल्या ज्या मार्गाने विजापूरहून वाईपर्यंत आला त्या मार्गावर एखादे बळकट लष्करी ठाणे असावे म्हणून देखील या किल्याची निर्मिती झाली असावी. दस्तुरखुद्द शिवरायांचा या किल्यावर दोन महिने मुक्काम होता. ही सगळी माहिती सोबतच्या सवंगड्यांना सांगून गडाच्या गोमुखी बांधणीच्या पूर्वाभिमुख दरवाजातून वर आलो. दरवाजा आजही सुस्थितीत आहे. 
 वर्धनगडाचे मुख्य प्रवेशद्वार
  वर्धनगडाची तटबंदी
वीरगळ
या दरवाज्यापासून तटबंदीची बळकट भिंत अवघ्या गडाला कवेत घेऊन पुन्हा दरवाज्यापर्यंत येते. या भिंतीवर मधे चिलखती बुरुज आहेत. डोलकाठीची जागा आणि तटातून खाली घाटाकडे उतरणारा एक चोरदरवाजाही आहे. दरवाजातून वर जाताना एक शंकराचे मंदीर लागले. त्याच्याच बाजूला एक पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. थोडं वरच्या बाजूला एका लहानश्या घुमटीत हनुमानाची भग्न मूर्ती आहे.
 शंकराचे मंदीर
 वर्धिनीमातेचे मंदीर
पायर्‍यांनी थोडं वर गेल्यावर आपण गडाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचतो. तिथे वर्धिनीमातेचे मंदीर आहे. दर्शन घेऊन मागल्या बाजूच्या उतारावरून तटबंदीवर आलो. थोडी फोटोगिरी करून चोरदरवाज्याकडे आलो. तो चोरदरवाजा पाहून राजगडाच्या चोरदरवाज्याची आठवण आली. इथे महाराजांच्या गडबांधणीच्या तंत्राचे पुरावे मिळतात. गोमुखी बांधणीचा दरवाजा, चिलखती तटबंदी, अभेद्य बुरूज आणि तटातून खाली उतरणारे चोर दरवाजे असे एक ना अनेक. मावळतीच्या किरणांसोबत गडाचा निरोप घेतला.
 वर्धनगडाच्या तटामधला चोर-दरवाजा
अशीच आपली फोटोगिरी
वेळेच्या फारच मागे होतो त्यामुळे महिमानगडाचा बेत रद्द करून वारूगडाकडे निघालो. वाटेत दहिवाडीत अत्यंत पाणचट चहा घेतला आणि दहिवाडी-फलटण रस्त्यावरील मोगराळे गावाकडे निघालो. मोगराळे गावातून तोंडल्यापर्यंतचा रस्ता थोडा कच्चा आहे. तोंडल्याहून आठ किलोमीटचा रस्ता अनपेक्षितपणे खूपच चांगला होता. थेट वारूगडाच्या माचीवर असलेल्या भैरवनाथाच्या मंदिरासमोर गाड्या थांबल्या. थोडावेळ पाठ टेकवून सूप करायला घेतलं. पारावर बसून वाफाळत्या सूपाचे घोट घेताना गप्पांना रंग चढत होता. प्राजक्ता आणि सायलीने केलेली मॅगी हाणताना मेंढी (शुभम) आणि मॅगी (केतन) यांनी इतका उच्छाद मांडत होते की  जनतेची हसून हसून मुरकुंडी वळाली होती. पोटात भर पडताच मंडळी थोडी सुस्तावली. संधीचा फायदा घेत मी ट्रायपॉड घेऊन बालेकिल्याखालच्या मोकळ्या मैदानावर सटकलो. पौर्णिमेचा चंद्र मुक्तहस्ताने चांदण्याची उधणळ करीत होता. त्या शितल चांदण्यात वारुगडाचा बालेकिल्ला अक्षरश: न्हावून निघाला होता. त्याच्या तटावर असणारं वडाचं भलं थोडलं झाड त्या भारलेल्या वातावरणात एक प्रकारची गूढता आणित होतं. त्यात मधेच एखाद्या टिटवीचा कर्कश्य आवाज तर कधी एखाद्या घुबडाचा धीरगंभीर घुत्कार, सोबतीला गावातल्या कुत्र्यांचं अधून मधून केकाटणं आणि अगदी हाडं गोठवणारी नसली तरी बर्‍यापैकी थंडी अंगावर सरसरून काटे आणत होती.

चांदण्यात न्हायलेलं भैरवनाथाचे मंदीर आणि खाली वारूगडाचा बालेकिल्ला


थोडे फोटू काढून झाल्यावर उरल्या सुरल्या मंडळींनी शेकोटी पेटवली आणि गप्पा मारीत बसलो. दोन अडीचच्या सुमारास स्लिपिंगबॅग मधे शिरलो तो सकाळी साडेआठलाच बाहेर पडलो.
उशीर झाला होता म्हणून भूषणगडाला फाटा देऊन वारूगड जरा निवांतपणे बघायचं ठरवलं. समोरच्याच एका खोपटातल्या मावशींकडे चहा सांगितला आणि सामान बांधायला घेतलं. चहा घेऊन मंदिराच्या उजवीकडे फलटण दरवाज्याकडे निघालो. खालून जाधववाडीहून येणारी वाट फलटण दरवाज्यातून माचीवर येते. दरवाज्याची कमान मधून ढासळली आहे. दरवाज्याहून पुढे गेल्यावर वाटेवर उजवीकडे एक पाऊलवाट तटबंदीहून वर बालेकिल्याच्या प्रवेशद्वाराकडे जाते तर दुसरी पांडवकालीन टाक्यांकडे जाते. बर्‍याच खोलगट भागात शेजारी शेजारी अशी दोन जोडटाकी आहेत आणि त्यामागे कड्यात आतमधे खोदिव खांबटाकी आहेत. ती टाकी पाहून आपण पुन्हा डांबरी सडकेवरून मंदीरापाशी येतो.

 बालेकिल्याच्या पायथ्याला असलेली पांडवकालीन टाकी
कमान ढासळलेला फलटण दरवाजा
 वर जायची वाट लक्षात न आल्यामुळे आम्ही धर्मशाळेच्या मागून बालेकिल्याच्या तटाला भिडलो. सायली खालीच थांबली तर प्राजक्ताला पायाला लागल्यामुळे मधूनच माघार घ्यावी लागली. बाकी जनता एकमेकांचा आधार घेत तो कडा येंगून पडल्या तटातून बालेकिल्ल्यात पावती झाली. बर एक फरसबंदी चौथरा आहे. पूर्वी या जागी सदरेची इमारत होती. बालेकिल्ल्याचा विस्तार अतिशय आटोपशीर आहे. एक चौकोनी कोरडं टाकं, एक भक्कम चिलखती बुरूज, एक कोरडी विहीर आणि तटबंदीवर उगवलेला भला थोरला वड. त्या वडाच्या सावलीत थंड वार्‍याच्या सुखद झुळकी अंगावर घेत मंडळी बराच वेळ पहुडली होती. थोडं हाल्याहाल्या झाल्यावर चौथर्‍यामागच्या दरवाज्याकडून सगळी माचीवर पायउतार झाली.

 पडझड झालेले वारूगड बालेकिल्याचे प्रवेशद्वार
 बालेकिल्यावरील टेहाळणीचा चौथरा
 बालेकिल्याहून दिसणारी माची आणि तटबंदी
 तटबंदीतील बुरूज
 दोन दिवसात तीन किल्ले फत्ते झाले होते. वेळेचे नीट नियोजन झाले असते तर पाचही किल्ले पाहता आले असते. थोडी रुखरुख मनात ठेऊन बाकीच्या किल्ल्यांच्या भटकंतीचे बेत बनवत वारूगडमाची सोडली आणि परतीच्या प्रवासाला लागलो. सातारा आणि माणदेशातल्या छोटेखानी किल्यांची ही भटकंती वेगळाच आनंद देऊन गेली.
डोंगरयात्राचे शिलेदार
डावीकडून पौर्णिमा, विजया, श्रीकांत, शितल, आनंद उर्फ पिंट्या, अस्मादिक, शुभम उर्फ मेंढी, केतन उर्फ मॅगी, नितीन, प्राजक्ता, अस्मिता, सायली आणि नेहा.