सह्याद्रीच्या सगळ्या भेटी कायमच अविस्मरणीय असतात. वर्षांतले कित्येक दिवस मी भटकंतीच्या आखण्या करण्यात, नकाशे धुडाळण्यात, भटकण्यात, त्यांच्या चित्रमय आठवणीत घालवतो. हे मोजणंही हल्ली सोडून दिलं आहे. महिन्यात किमान तीनवेळा तरी सह्याद्रीत भटकावं असा अट्टाहास असतो. (प्रत्येक वेळेस तो पूर्ण होतोच असं नाही).
मनात येईल त्यावेळी, हाताला येतील त्या गोष्टी सॅकमधे कोंबायच्या आणि निघायचं. अनेकदा तर कुठे जायचं हे ही ठरलेलं नसतं, मग अशावेळी माझ्या सगळयात जवळच्या स्नेह्याकडे आपोआप पावले वळतात . तो स्नेही म्हणजे राजगड ! माझां सखां, जीवलग! अजूनही विशेषणे लावता येतील पण ती ही कमीच . त्याच्या सानिध्यात सगळ्या जगाचा विसर पडतो. शिवबांच्या हयातीतील उणीपुरी चोविस वर्षे पाहिलेल्या या राजगडाबद्द्ल प्रचंड जिव्हाळा
राजमाचीशी माझी एका वेगळ्याच संदर्भात नाळ जोडली गेली आहे. गो.नि.दां ची "माचीवरला बुधा" ही राजमाचीवरची कथा वाचल्यापासून कमालीची अस्वस्थता होती. त्यानंतर तो बुधा कधीतरी दिसेल या भाबड्या आशेतून पंचवीस ते तीस वेळा राजमाचीवर वेड्यासारखा भटकलो. त्याच्या खोपटाच्या जागेजवळ अनेक रात्री जागून काढल्या. अजूनही मी राजमाचीवर जाताना तीच वेडी आशा बाळगून असतो. माचीवरच्या बुधाचा शेवट वाचताना अंगावर आलेला शहारा आणि त्याच वेळी डोळ्यात आलेलं पाणी अजूनही तितकंच अस्वस्थ करतं.
नक्की काय करतो मी या भटकंतीत ? कधी रात्री बारा-एक च्या सुमारास घर सोडून एस्.टी. पकडणं, कधी एस.टी. स्टँडवरच पथार्या पसरून सकाळच्या पहिल्या गाडीची वाट पहाणं, किल्ल्यांच्या वाटा हुडकणं, त्या बर्याचदा चुकणं, कधी कुठल्या गडाचे राकट कडे लांघणं, कधी घाटवाटांच्या गर्द झाडोर्यातून तळकोकणात उतरणं, कधी कोण्या तटावर पाय सोडून सैराट वारा छातीत भरणं, रायगडावरच्या सूर्यास्ताच्या एका नेमक्या क्षणासाठी दोन दोनशे फोटो काढणं, कधी एखादया अवखळ ओहोळावर पालथा पडून थंडगार पाण्याने तहान भागवणं, कधी कोसळत्या पावसात चिंब होणं, कधी कुठल्या ओढ्यात, डोहात यथेच्छ डुंबणं, पावसाच्या सरींचे कर्णमधूर संगीत चहाच्या घोटांसवे ऐकणं, कधी कुठल्या धूर भरल्या गुहेत चुलीवर काही बाही शिजवणं, कधी एखाद्या किल्ल्यावरच्या मंदीरासमोरील ओसरीवर उताणं पडून आकाशातलं चांदणवैभव न्याहाळणं, गडमाथ्यावर पोहोचल्यावर क्षत्रियकुलावतंसच्या घोषणेनंतर अंगावर आलेले शहारे अनुभवणं, रात्रीच्या शेकोटीसमोर बसून भूताखेतांच्या गोष्टी सांगणं, शिवथरघळीतल्या जलप्रपाताचे शिंतोडे झेलत मनाचे श्लोक म्हणणं, कधी कोण्या गडावर महाराजांच्या सदरेसमोर नतमस्तक होणं, कधी पावनखिंडीत बाजींच्या बलिदानाच्या स्मरणात नकळत गालावर ओघळलेले अश्रू पुसणं, कधी वैराटगडावर फुटलेल्या तोफगोळ्यांचे कपचे हुडकणं, कधी रात्रीच्या अंधारात राजमाचीची वाट तुडवणं, अन् कधी गो.नि.दां. च्या कादबंर्यांतील पात्रं आणि त्यांचे संदर्भ धुंढाळत फिरणं.. या सगळ्यातून काय मिळतं ?? समाधान! एक वेगळ्याच प्रकारचं, अनाकलनीय, गूढ आणि हे गूढ जितकं अनाकलनीय तितकंच जास्त
पण तरीही मी म्हणेन की , मी किल्ल्यांवर का भटकतो याचं उत्तर अजूनही शोधतोच आहे. आणि मला ते इतक्या सहज मिळू नये असंच वाटतं, जेणेकरून माझ्या भटकंतीत कधीही खंड पडणार नाही !
--
अमोल नाईक (जातीवंत भटका)