५ जुलै, २०११

गोप्या घाटातून शिवथर घळीत !

गोप्या घाटातून शिवथर घळीत !!!

 गोप्या घाटाच्या माथ्यावर

यंदाच्या पावसाळ्यातल्या पहिल्या मोठ्या ट्रेकची आखणी झाली. नेहमीचेच लोकप्रसिध्द किल्ले फाट्यावर मारून सह्याद्रीतल्या थोड्या अनगड वाटांवर उंडारायचं अशी खुणगाठ मनाशी आधीच बांधली होती. मढ्या आणि उपांढ्या घाटातून समर्थांच्या शिवथर घळीत बर्‍याचदा उतरलो होतो त्यामुळे यावेळेस गोप्याघाटाशी सलगी करण्याचा निर्णय घेतला. गोप्या घाटात येऊन बरीच वर्षे लोटली होती. त्यामुळे हा ट्रेक मला खूप दिवसांपासून खुणावत होता. सुरुवातीला ८-१० जणांनी येण्याची इच्छा दर्शविली पण आदल्या दिवशी रात्री मी, राहूल, वसुधा आणि ऋषीकेश इतकीच टाळकी शिलकीत होती. रात्री सहज म्हणून ऑनलाईन आलो आणि प्रशांतला एका दिवसात परत येऊ शकतोस शिवथर घळीतून ! असे आमिष दाखवले आणि प्रशांत आणि त्याचा मित्र देवेंद्र गळाला लागले. त्यांना याची कल्पना नव्हती की शनिवारच्या रात्री हेच दोघे परत यायचा त्यांचा निर्णय रद्दबातल करणार होते. ऋषीकेश तळेगावला रहात असल्याने तो शुक्रवारी रात्रीला माझ्या घरी मुक्कामास होता. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास आम्ही सगळे स्वारगेटच्या एस्.टी. स्टँडवर गोळा झालो. ८.०० वाजता ची स्वारगेट - वेल्हा पकडून आम्ही पुणं सोडलं. त्या एस.टी. मधे बसल्यापासून का कुणास ठावूक पण मला एक सारखी पु.लं. च्या म्हैस मधल्या एस.टी. ची आठवण होत होती. मग मीही शेजारी बसलेल्या ऋषीकेशचा  खांदा हा एस्.टी. महामंडळाने आपल्याला आंदण दिलेली उशी आहे, अशी समजूत  करून घेतली.  मार्गासनी फाट्यावर एस.टी. ला करकचून ब्रेक लागला आणि मी, माझी तात्पुरती उशी, आणि एस्.टी. मधला समस्त ऐवज एकदम पुढे फेकलो गेलो. माझी झोपमोड झाली आणि त्या ग्लानी मधेच तत्क्षणी मी म्हैस मधलं एक पात्र असून आता धर्मा मांडवतकर येऊन एस्.टी.च्या डायव्हरला धरणार असे वाटले. पण सुदैवाने तसे काही झाले नाही. एका वडाप वाल्याने त्याची जीप अंगावर घातल्यामुळे हा ब्रेक लागला होता, हे मला खिडकीतून बाहेर पाहील्यावर कळाले. गाडी १०.०० ला वेल्ह्याला पोहोचली. ट्रेकची सुरुवात वडापाव हादडून केल्याशिवाय राहवत नाही त्यामूळे सगळ्यांनी दोन दोन वडापाव चोपून बाजारपेठेकडे  कूच केले. कुंबळे ला जाणारी एस्.टी. संध्याकाळी ५.०० ला होती. म्हणून तिथल्या एका पिकअप वाल्याशी भाड्यावरुन घासाघिस सुरु झाली. तिथे थांबलेल्या एका म्हातार्‍याकडून कळले की कुंबळ्यातून गोप्या गावाकडे  जाण्यासाठी उथळ जागेवरून नदी पार करावी लागेल त्या पेक्षा निगडे गावातून साकव (झाडांपासून बनवलेला पूल) पार करून पायवाटेने गोप्या गाठता येईल. मग ६०० रुपयात निगडे गावात सोडण्याच्या बोलीवर तो  पिकअपवाला तयार  झाला. जनता पिकअपमधे चढून बसली, वेल्हे - निगडे रस्ता फारच खराब आहे.  पिकअपमधे खाली बसलो होतो त्यामुळे आमची बुडं जवळ जवळ चेपली होती. १२.०० वाजता निगड्यात  उतरलो आणि गावतून साकवाची वाट धरली.

 निगडे गावातून निघताना

पहिलंच वळण चुकलं आणि आम्ही जवळच्याच शेतात काम करणार्‍या गावकर्‍यांना शरणं गेलो. मला ग्रामीण बोलीभाषेत बोलायला प्रचंड आवडतं, मी पुढे सरसावून विचारलं, दाद्या, साकवं कुण्या अंगाला राहीला रं ?? तिकून अपेक्षित प्रतिप्रश्न, कुनीकडून आलासां ?? आम्ही पुण्याहून... "साकवांची वाट त्या तिकडं मागल्या अंगाला राहीली बगा ..." मग आपणहूनच तो दादा आम्हाला वाट दावायला आला. त्याच्याशी गप्पा मारत साकवाकडे निघालो. "यंदा पानी कमी झालंय नायं ...??", "ह्या टायमाला जरा कमीच हाय जोर.... ", "मंग काय काय लावलं हाय यंदाच्या मौसमाला ??", "आता बघा ह्यो खालच्या अंगाला भात टाकलाय, तिगडं वर पानी जरा कमी असतंया, तिगडं नाचणी !! आणि तुम्ही आलासां तिगडं तिळ लावला आहे." मग मी त्याला साकवाबद्दल विचारलं. तसा तो म्हणाला सरकारी कामं आमच्या पतूर पोहोचीत न्हाईत, म्हणून समद्या ग्रामस्थांनी मिळून नदीवर साकव घातला आहे. तो साकव पाहिल्यावर मी थक्क झालो.

 नदीवरचा साकव

साकव पार करताना राहूल

त्या दादाचे आभार मानून एका वेळेस एकएकाने साकव पार केला आणि गोप्याच्या वाटेला लागलो. वाटेत ठिकठिकाणी भाताची शेतं विलक्षण हिरवाळली होती. मधे एक-दोन ठिकाणी वाट चुकलो. पण थोडा आजूबाजूला जाऊन अंदाज घेताच पुन्हा मुळपदावर आलो.

 कामं सुरू झाली आहेत.
  वार्‍यावर तरारणारी भाताची रोपं
एका धनगरपाड्यात शिरताच कुत्र्यांनी एकच हलकल्लोळ माजविला. त्यांच्यासाठी आमच्या रंगीबिरंगी वेषभूषा नवख्या होत्या. मग त्यांना पारले-जी चा नैवेद्य दाखवून एका मावशीला वाट विचारली. एका खोपटाच्या बाहेर एक सुतारदादा लाकडाचे औत बनवित बसला होता. त्याच्याशी चार शबूद बोलून आम्ही म्होरं चालते झालो.

  
धनगरपाडा

  औताचं काम चालू आहे
तीन वाजता एकदाचे ते गोप्या गाव आलं आणि "आपल्या पोटात एक भांड असतं, त्यात जीव नावाची गोष्ट पडली की हायसं वाटतं...." असं काहीसंस  झालं. गावाच्या थोडं अलिकडेच भाताच्या शेतात बाया बापे मिळून लावणी साठी भाताचे गठ्ठे  बांधीत होते. त्यांचे थोडे फोटो काढले. काम करताना ते सगळे त्यांच एक लोकगीत म्हणत होते. त्यांचे ते गाणं मी मोबाईल मधे रेकॉर्ड करून घेतलं.

भाताचे भारे बांधणं सुरू आहे
 भाताचे भारे बांधणं सुरू आहे
 भाताचे भारे बांधणं सुरू आहे
 आम्ही ठाकरं ठाकरं ....या रानाची पाखरं ...
 
भाताचे भारे बांधणं सुरू आहे
हिरवीगार भाताची रोपं

हिरवीगार भाताची रोपं
एक चिमूरडी डोक्यावर इरलं घेऊन बांधावर बसली होती. तिच्या चेहर्‍यावरच्या निरसागसतेने थेट काळजालाच हात घातला. तिच्या हातात वसूधाने एक बिस्कीटचा पुडा दिला आणि आम्ही एका बंद घराच्या पडवीत पडलो.




 
गावात मोजकीच खोपटं आहेत. सगळी मंडळी शेतावर कामाला गेलेली. शाळेला सुट्टी असल्यामुळे सगळी चिल्लीपिल्ली वाडीभर नाचत होती त्यांना ब्रेड आणि बिस्कीटं दिली आम्ही बांधून आणलेले भूकलाडू सोडले आणि त्यावर तुटून पडलो. शेतात काम करणार्‍या एकाने आरोळी मारून विचारलं... "कुनीकडं निघालांत रं पोरांहो ~ ??" त्याला घळईत चाललोय सांगताच तो म्हणाला, लवकर निघा नाहीतर अंधारल्यावर अवघड काम होऊन बसंल ... "त्याची बत्तीशी काही अगदीच खोटी ठरली नाही"
आम्ही साडेतीनला गोपे सोडलं आणि घाटाकडे निघालो. निघाल्या पासून एकदाही म्हणावा तसा पाऊस लागला नव्हता असा विचार मनात डोकावताच, पावसाची एक जोरदार सर चिंब भिजवून गेली. वातावरणात मस्त गारवा आला होता. परत वाट चुकलो, गोप्यातून पाहीलेल्या एका कातकर्‍याच्या झापापाशी आलो. तर तिथे घरात कुणी नाही !! कचरे नावाचा हा गोपालक त्याच्या जनावरांना चरायला घेऊन गेला होता. लांबवर एक इरलं घातलेली आकृती दिसली आणि मी आणि ऋषीकेश त्या दिशेने धावलो. आधीच खूप ऊशीर झाला होता त्यामूळे त्याला ठळक वाटेपर्यंत बरोबर घेतला. एकदाचं आम्ही घाटाच्या माथ्यावर येऊन ठेपलो.

 घाटाच्या माथ्याकडे जाताना

 डावीकडून देवेंद्र, प्रशांत, ऋषीकेश, राहूल आणि वसुधा

 गोप्या घाटाच्या माथ्यावर मी :)
थोडे फार फोटो काढून घाट उतरायला सुरूवात केली. खाली कोकण फारच सुंदर दिसत होतं. घाटासमोरच्या डोंगरांवरून २-३ मोठ्ठे धबधबे आपल्या जीवाची पर्वा न करता त्या खोल दरीत कोसळत होते. ज्युरॅसिक पार्कच्या लॉस्ट वर्ल्ड मधे आल्यासारखे वाटत होते.





ज्युरॅसिक पार्कची अनुभूती


अजून लांबचा पल्ला गाठायचा होता.  थोडे फोटो काढून तिथून काढता पाय घेतला. वाटेत एका ठिकाणी उजवीकडून कर्नावडीतून येणारी वाट येऊन मिळते.






सरळ खालची वाट पकडून एका छोट्या वाडीवर आलो. तिथून पाणपिशव्या भरून घेतल्या आणि कसबे शिवथरची वाट धरली. गावात आल्यावर एका मावशीला चहा कुठे मिळेल म्हणुन विचारले तर, "कशाला कुठं जाता मीच टाकते चहा बसा पडवीवर... " असे म्हणून ती माऊली घरात अंतर्धान पावली. चहा पिता पिता गप्पा रंगल्या आणि गावातली ३-४ म्हातारी माणसं जमली. "कश्यापाई हिंडता अशा डोंगररर्‍यांतून भ्या नाही का वाटत ??" या त्यांच्या भाबड्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हा प्रश्न मला पडला !! वसुधा आमच्या सोबत गोप्या उतरून आली याच त्या म्हातार्‍यांना फार कौतूक वाटलं.पावणेआठ झाले होते. अंधार पडलाच ...वाटेत झाडोर्‍यामधे काजव्यांची सभा भरली होती. मग आम्ही कुंभे शिवथर, अंबेशिवथर करीत अंधारातच शिवथर घळीत पोहोचलो तेव्हा ८.३० झाले होते. प्रशांत आणि देवेंद्रने घरी परत यायचा निर्णय मोडीत काढला होता. सगळेच दमले होते. साडे आठ तास चालून पायात गोळे आले होते. वर मठात जाताच आम्हाला गर गरम भात आमटी, भाजी पोळी, जिलेबी आणि ताक असे प्रसादाचे जेवण मिळाले. आणखी काय हवे !! गरमा गरम जेवून आम्ही वरच्या हॉलमधे निद्रधीन झालो.
पावणेपाच चा गजर लावला होता. सकाळी पाचला काकडआरती होती.  तोंड धुवून खाली आलो. पहाटे पहाटे घळी मधे फार प्रसन्न वातावरण होते. ६.३० ला आरती संपल्यावर चहा घेतला आणि घळीवरून पडणार्‍या धबधब्याकडे गेलो तिथे यथेच्छ क्लिकक्लिकाट करून न्याहारीला बसलो.

 शिवथर घळीतला प्रसिध्द जलप्रपात


 || जय जय रघुवीर समर्थ ||
 
|| जय जय रघुवीर समर्थ ||
प्रशांत आणि देवेंद्र सव्वासातच्या एस्.टी. ने पुण्याकडे निघाले. आम्ही मात्र वरंधात थांबणार होतो त्यामुळे थोडे निवांत होतो. न्याहारी उरकून दहा वाजता आम्ही घळ सोडली. बारसगाव फाट्यापर्यंत एस्.टी. आणि तिथून जीप पकडून वरंध्यात आलो. घाटातून दिसणारा नजारा मोठा विलोभनिय होता. फोटो काढून भजीच्या टपर्‍यांकडे मोर्चा वळविला.













वरंधाघाटात जाऊन भजी न खाणं म्हणजे काशीला जाऊन दर्शन न घेता परत येण्यासारखे आहे.  हे असले पातक न करता आम्ही यथेच्छ भजी हादडून घेतली. तेव्हड्यात त्या भजीवाल्या कडून एका इंडीकावाल्याची  माहीती मिळाली. तो इंडीकावाला एकटाच होता. आणि आम्ही चार. गाडी १ और आदमी पांच !!   झालं तर मग, त्याने आम्हाला थेट सिंहगडरोडलाच आणून सोडले. दोन दिवस मोबाईल गाडी आणि शहरी जीवनापासून लांब राहून पुढचा आठवडा जगण्यासाठी ताजेपणा भरून घेतला आणि पुण्यात परतलो. येताना मन पुढल्या आठवड्याचा ट्रेक ठरवण्यात गुंतले होते हे वेगळे सांगायला नकोच !!!